हिंदू-मुस्लीम सख्याच्या परंपरा सुरू राहिल्या पाहिजेत : राज ठाकरे

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवर संदलचा धूप फिरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू-मुसलमानांमध्ये अशाप्रकारे सख्याच्या गोष्टी सुरु आहेत. या गोष्टी सुरुच राहिल्या पाहिजेत, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला म्हणून हिंदू धर्म भ्रष्ट होईल, इतका तो काही कमकुवत आहे का, असा परखड सवाल त्यांनी विचारला. जिथे मराठी मुसलमान राहतात, तिथे दंगली होत नाही, हा माझा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?
“मला वाटतं की परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. तसंच हा जो काही विषय आहे तो संस्थांनाचा आणि गावकऱ्यांचा विषय आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात. माहीमचा दर्गा आहे मकदुमबाबांचा तिथे उरुस असताना जी चादर चढवतात ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. अशी अनेक उदाहारणं देता येतील. मला वाटतं जे परंपरा सुरु ठेवली पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आपला आहे का? याआधी मी देखील दर्गा, मशिदींमध्ये गेलो आहे. मुस्लिम लोकंही मंदिरात येतात. आपलीच काही मंदिरं अशी आहेत जिथे काही जातींनाच गाभाऱ्यात जाऊ दिलं जातं.’
वाद निर्माण करणारे कोत्या वृत्तींचे
मला वाटतं की या प्रकरणी जे वाद निर्माण केला आहे त्या माणसांची वृत्ती कोती झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. इतरांनी त्यात पडू नये, बाहेरच्या लोकांनी पडायची गरज नाही. यामध्ये कुणाला दंगली हव्या आहेत का? आणखी एक महत्त्वाचं, मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधीच दंगली होत नाहीत. त्यांचं सगळं बालपण, पिढ्या इकडे राहिलेल्या असतात. त्यामुळे अशा प्रकारे जे सामंजस्य आहे ते काही लोकांनी बिघडवू नये.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
‘हिंदू खतरे मे’ कसा काय असू शकतो
काही लोक हे सामंजस्य बिघडवत आहेत. बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात ‘हिंदू खतरे मे’ कसा काय असू शकतो, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
कर्नाटक निकालांवरून भाजपला टोला
कर्नाटक निवडणुकीच्या बाबतीत मी जेव्हा माझी प्रतिक्रिया दिली, ते भाजपने समजून घेणे गरजेचे आहे. पण भाजपचं असं म्हणणं आहे की, इतरांनी कोणी प्रतिक्रिया देऊ नयेत. मग उद्या वर्तमानपत्रांनी अग्रलेखही लिहायला नकोत. याचा अर्थ भाजपबाबत कोणी बोलायचंच नाही का? हे मात्र कोणाच्याहीबाबतही बोलणार, असे सांगत राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.


