कुचकामी सरकार, कोणतंही गांभीर्य नसलेले शिक्षणमंत्री महाराष्ट्राच्या नशीबी आल्यानं, राज्याचं नशीबही फुटलं आणि पेपरही सामनातून हल्लाबोल
मुंबई : आजच्या सामना अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. कुचकामी सरकार, कोणतंही गांभीर्य नसलेले शिक्षणमंत्री महाराष्ट्राच्या नशिबी असल्यानं राज्याचं नशीबही फुटलं आणि पेपरही फुटलेत, असा हल्लाबोल आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. तर बारावी पेपरफुटीचं प्रकरणही राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार का? असा खोचक सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आला आहे. तसेच, चाळीस डोके, पन्नास खोके सरकारचाही संबंध डोक्याशी कमी आणि खोक्यांशी जास्त आहे, असं म्हणत शिंदे गटावरही निशाणा साधण्यात आला आहे.
लोकसेवा आयोगाचे प्रकरण आपण पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवू,’ असे ‘बुद्धिमान’ वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. तसे बारावी पेपरफुटीचे प्रकरणही ते पुढील निर्णयासाठी ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत काय? महाराष्ट्रात एकापाठोपाठ सगळेच पेपर व निकाल फुटताना दिसत आहेत. याआधी स्पर्धा परीक्षांचे, म्हाडाच्या परीक्षांचेही पेपर फुटले. बारावीचा रसायनशास्त्राचा म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर फुटला व पाठोपाठ गणिताचा पेपर फुटला. हे कसले लक्षण मानायचे? केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याप्रकरणी मालाडमधील खासगी क्लास चालकास अटक केली. महाराष्ट्रातील पेपरफुटीमागे खासगी क्लासचे चालक आहेत, असे सांगितले जात असले तरी इतकी गोपनीयता, सुरक्षा व्यवस्था ठेवूनही पेपर परीक्षेआधी फुटतात हे धक्कादायक आहे, पण महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून कोणत्याही परीक्षेशिवाय बेकायदेशीरपणे ‘पास’ होण्याचा नवा पायंडा सुरू झाला आहे.”, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
“निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत सर्व निकाल आधीच फुटले आहेत. ”निवडणूक आयोगाचा निकाल काही झाले तरी आमच्याच बाजूने लागणार. शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार. सगळे सेटिंग झाले आहे,” असे छातीठोकपणे सांगणे म्हणजे निकाल आधीच फुटल्यासारखे आहे. शेवटी निकाल त्याच पद्धतीने लागला. भारतीय जनता पक्षात मोदींपासून स्मृती इराणींपर्यंत प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्हतेवर, पदव्यांवर शंका व प्रश्नचिन्ह आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या डिग्र्या बोगस आहेत व प्रत्यक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे सोंग आणणाऱ्या किरीट सोमय्यांची ‘डॉक्टरेट’ बनावट असल्याचे उघड झाले. त्यांच्या डॉक्टरेटचा प्रबंध व संबंधित कागदपत्रे विद्यापीठाच्या रेकॉर्डवर नाहीत. मुंबईत भाजपशी संबंधित अनेकांच्या ऑक्सफर्ड, केंब्रिजच्या ‘डॉक्टरी’ पदव्या बोगस निघाल्याची प्रकरणे उघड झाली. त्यामुळे अशा सत्ताधाऱयांच्या अमलाखाली ‘परीक्षा’ वगैरे हा फक्त फार्स ठरतो व सध्या महाराष्ट्रात तो जोरात सुरू झाला आहे.”, असं म्हणत सामना अग्रलेखातून भाजप नेते किरीट सोमय्यांवरही निशाणा साधण्यात आला आहे