“रस्ते, गटारांसारख्या ‘छोट्या गोष्टीं’ऐवजी ‘लव्ह जिहाद’ला महत्त्व द्या”; BJP नेत्याचा कार्यकर्त्यांना सल्ला

मंगळुरु : लोकांनी निवडणुकीमध्ये रस्ते, नाले आणि इतर छोट्या मुद्द्यांऐवजी लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, असं मत कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नलिन कुमार कतील यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
मंगळुरु शहरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘बूथ विजय अभियान’ नावाचं मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलेलं या वेळेस नलिन कुमार कतील यांनी हे वक्तव्य केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “तुम्ही लोकांनी आता रस्ते, गटारे, नाले आणि अन्य छोट्या गोष्टींबद्दल विचार किंवा चर्चा करता कामा नये. तुमच्या मुलांच्या आयुष्याशी संबंधित मुद्दे म्हणजेच लव्ह जिहादला थांबवायचं असेल तर आपल्याला भाजपची (भाजपा सरकारची) गरज आहे.”
पीएफआयवर बंदी घालण्यात आली नसती तर मंचावर भाजपचे नेते मोनप्पा भंडारी, आमदार वेदव्यास कामथ आणि हरि कृष्ण बंटवाल (दक्षिण कन्नडचे नेते) आपल्यात नसते त्यांच्या केवळ फोटोंना हार घातलेलं दिसलं असतं, असं कतील यांनी म्हटलं आहे.




