वारजेत नागरिकांनी, संस्थांनी मेहनतीने लावलेली झाडे जगवण्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष ; स्थानिकांमध्ये संतापाची भावना..

वारजे : वारजे परिसराला लागून असणाऱ्या वन विभागाच्या जागेवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिक सामाजिक संस्था, पुढे येऊन वृक्षारोपण करत असतात. नागरिकांनी, संस्थांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे वन विभागाचे काम हलके आणि सोयीचे झाले असले तरी वन अधिकाऱ्यांना त्याची जाणीव नाही का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. वन विभागाच्या जागेवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्याकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून त्यांच्यामध्ये संतापाची भावना आहे.
वारजेतील ईशान्यनगरी जवळ असणाऱ्या वन विभागाच्या टेकडीवर महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या पुढाकारातून अनेक सामाजिक संस्था व नागरिक वृक्षारोपण करत असतात. तसेच धुमाळ यांच्या प्रयत्नातून 3 वर्षापूर्वी वन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे डुक्कर खिंडीजवळ वन विभागाच्या किमान 35 एकर जागेमध्ये संजीवन उद्यान विकसित केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणावर देशी झाडांची लागवड नागरिकांना घेऊन करण्यात आली आहे. परंतु या झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.

सकाळी टेकडीवर येणारे नागरिक बाटल्यांमध्ये पाणी आणून झाडांना घालत असतात पण ते पाणी किती झाडांना पुरणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होऊ लागल्याने झाडे करपू लागली असून त्यांना पाण्याची गरज आहे. या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी बैठक घ्यायला सांगूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
धुमाळ म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी लागवड केलेल्या झाडांना पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. उरीटनगर ते चैतन्यनगरी या 24 मीटर डी पी रस्त्यालागत असलेल्या वन विभागाच्या जागेमध्ये अस्तित्वात असलेली अनावश्यक असलेली विषारी विदेशी झाडे वन विभागाने काढली होती. त्या ठिकाणी आपल्या स्थानिक सोसायटी, शाळांचे विद्यार्थी, बांधकाम व्यावसायिक व सामाजिक संस्था यांच्या मध्यमातून आपण किमान 7000 वृक्षांची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यात या झाडांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. या वृक्षांना कशा पद्धतीने पाणी पुरवठा करता येईल या संदर्भात वन विभागाचे संबंधित अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांची एक बैठक त्वरित घेण्याची मागणी आपण केलेली आहे. परंतु नागरिकांनी , संस्थांनी कष्टाने लावलेल्या झाडांबाबत वन विभागाला गांभीर्य नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
सुरक्षारक्षक नसल्याने वन विभागाच्या जागेत गैरप्रकार
संजीवन वनोउद्यान व ईशान्यनगरी जवळील वन टेकडीवर सुरक्षा रक्षक नसल्याने या टेकड्या तळीरामांसाठी अड्डा बनल्या आहेत. रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार या टेकड्यांवर चालू असतात. एखादी चुकीची घटना या ठिकाणी घडल्यानंतर त्याला वन विभाग जबाबदार राहणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी तातडीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.



पर्यावरण रक्षणासाठी नागरिक पुढे येऊन काम करत असतील पण त्याला महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचे आवश्यक सहकार्य मिळत नसले तर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांनी लावलेली झाडे जगवण्याचे काम वन विभागाचे नाही का? वन विभाग केवळ नावाला आहे का ? नागरिकांनी पुढे येऊन भकास पडलेल्या वन विभागाच्या टेकड्या हिरव्या करण्याचा प्रयत्न केला. देशी झाडे लावण्यासाठी पुढे आलेल्या नागरीकांमुळे मनुष्यबळ उभा राहिले त्यामुळे मोठ्याप्रमाणावर वृक्ष लागवड झाली. पण लावलेली ही झाडे पाण्याअभावी मारणार असतील तर नागरिकांनी घेतलेल्या मेहनतीचे काय ? वन विभागाचे अधिकारी नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी घेतलेली मेहनत वाया घालवणार का ? वृक्ष संवर्धनासाठी वन विभाग, महाराष्ट्र शासन करत असलेल्या जाहिराती या दिखावू आहेत का? असा प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होऊ लागले आहेत.






