नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामिन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांचे नाव आल्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे.
नितेश राणेंकडून वकिलांची मोठी फौज उभी होती. सहा वकीलांनी नितेश राणेंची बाजू मांडली यात संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब आणि प्रणिता पोटकर यांचा समावेश होता. तर सरकारतर्फे प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांनी बाजू मांडली.

गोट्या सावंत यांच्यावर 26 गुन्हे दाखल आहेत. धीरज जाधव, ज्ञानेश्वर माऊली, सचिन सातपुते हे तीन आरोपी आहेत या तिघांचा संबंध नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्याशी कसा आहे याचे तांत्रिक पुरावे पोलिसांकडे आहेत, असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. राकेश परब हा नितेश राणे यांचा खासगी सहाय्यक आहे. त्याच्या मोबाईलवरुन सचिन सातपुते याला 33 वेळा मोबाईलवरुन कॉल करण्यात आला आहे.
कायद्याची भीती सामान्य माणसाला राहिली पाहिजे. ज्याने हल्ला केला त्यांना कायद्याच धाक नाही. त्यांना इतकं निर्धास्त कोणी केले? पकडलेले पाचही आरोपी पुण्याचे आहेत, या पाचही आरोपींचे तक्रारदाराशी काहीही संबध नाही, तसंच फिर्यादीने यापैकी कोणाचेही नाव घेतलं नाही. फक्त सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीचा उल्लेख केला या इनोवातील आरोपींचा फिर्यादीशी काहीही संबंध नाही, मग यांनी फिर्यादीवर हल्ला का केला, असा प्रश्न सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उपस्थित केला.
अनोळखी माणसाने हल्ला केला, त्यांनतर त्याने नितेश राणे आणि गोट्या सावंतच नाव घेतले, तिथे उपस्थित असणे हे महत्त्वाचे नाही, पण कट करून हल्ला करणे हा पण गुन्हा होतो. विरोध करणाऱ्या एखाद्या माणसाला संपवणे हा देखील गुन्ह्याचा भाग आहे असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रदीप यांनी केला.
जबाबदार केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत सांगतात तुम्ही जर कारवाई केली तर लक्षात ठेवा केंद्रात आमचे सरकार आहे. ही धमकी नाही का? सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सवाल उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर संतोष परब यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर हल्लाचे आरोप केले होते.



