विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांनी वारजेतील काव्य संमेलन रंगले..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाबा धुमाळ यांच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन..
वारजे : वारजे येथे आयोजित करण्यात आलेले काव्य संमेलनात कवींनी विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर करत संमेलनात रंगत भरली. कोणी, गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला तर कोणी नात्यांच्या हळूवार पणावर प्रकाश टाकला, कोणी निसर्गाला आपलसं केलं. एकूणच या काव्य मैफलीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
राजयोग प्रतिष्ठान व प्रदीप उर्फ बाबा धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या मान्यवरांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी बाबासाहेब जाधव हे होते. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अक्रूर कुदळे, प्रदेश प्रवक्ते विवेक धुमाळे, युवक अध्यक्ष सागर कोल्हे, नंदकिशोर बोधाई, साहित्यिक वी. दा.पिंगळे, डी.के. जोशी, सुरेश जाधव, मानसी नलावडे, संयोजक माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, उपस्थित होते.

कवी उमा व्यास यांनी सादर केलेल्या एक दिवस तू बाई होऊन बघ या कवितेने उपस्थितांची दादा मिळाली. दत्तात्रय पायगुडे यांनी सादर केलेल्या मंद मंद या हवेत बहरली चांद रात, त्या तिथे फुला फुलात बावरली पाय वाट, रात राणीच्या फुलांचा दरवळला सुगंध दाट, मंद मंद या हवेत..या कवितेतील निसर्ग सौंदर्याच्या वर्णनाने सर्वांना भारावून टाकले.
नंदकिशोर बोधई यांनी श्रावणी सरी ही कविता सादर करताना रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा सप्तरंगी स्वप्नात झुलावे, उंच आभाळी जाता तेव्हा पाखरांना कवेत घ्यावे, रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा प्राजक्ताच्या मधू गंधात भिजावे..असे म्हणत श्रावणात बाहरणाऱ्या निसर्गाचा आनंद कसा घ्यावा हे सांगितले. शोभा जुमडे यांनी सुखाचं दान ही गझल सादर केली. बाळासाहेब पानसे वारकरी या कवितेने वारकऱ्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला. रामचंद्र पाचुलकर यांनी चंद्रमुखी ही कविता सादर केली. अंजली वाडकर यांची भागवत गीतेची शिकवण, ज्योत्स्ना तानवडे यांनी सादर केलेली अद्वैत, विजय जाधव यांच्या राजाच्या डोक्याला शिंग, तर विनायक देशपांडे यांनी सादर केलेली दिवस आजचा आनंदाचा या कवितांनी मैफलीत रंग भरले. यावेळी सहभागी कवी व कवयत्रींचा सन्मान करण्यात आला. ३५ कवींनी या काव्य संमेलनात सहभाग घेतला.
या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन अतुल घटवाई यांनी केले तर आभार साधना कुलकर्णी यांनी मानले.






