आघाडी सरकारची सर्वसामान्यांसाठी एकतरी योजना आहे का? भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा सवाल

नगरसेवक दीपक पोटेंच्या माध्यमातून ‘आयुषमान भारत’ योजनेचे कार्ड वाटप
पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे केवळ वसूलीसाठी स्थापन झालेले सरकार आहे. या सरकारला सर्वसामान्यांप्रती काहीही देणेघेणे नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी एकतरी योजना कार्यन्वित केली आहे का? असा सवाल भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला. पुणे शहर भाजपा सरचिटणीस आणि प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून ‘आयुषमान भारत’ योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मुळीक बोलत होते.
यावेळी पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेवक अजय खेडेकर,कोथरूड मंडळ अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, युवा मोर्चा शहर सरचिटणीस अभिजीत राऊत, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, स्विकृत नगरसेविका मिताली सावळेकर, सरचिटणीस अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, भाजपा पुणे शहर बूथ संयोजक कुलदीप सावळेकर, प्रभाग १२ चे अध्यक्ष राजेंद्र येडे, उपाध्यक्ष बाळासाहेब धनवे, सरचिटणीस अँड. प्राची बगाटे आदी उपस्थित होते.

मुळीक म्हणाले की, “आपल्या देशाला ३६५ दिवस समर्पित होऊन काम करणारे पंतप्रधान मिळाले आहेत. सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच ते आपली प्रत्येक योजना अंमलात आणतात. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे केवळ वसूलीसाठी स्थापन झालेले सरकार आहे. या सरकारला सर्वसामान्यांप्रती काहीही देणेघेणे नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी एकतरी योजना कार्यन्वित केली आहे का?”
संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षापूर्वी जनसंघ होता. या जनसंघाचे ब्रीद वाक्य ‘चलो दीपक जलाए वहाँ, जहाँ अभीभी अंधेरा है’ त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यात एक नवा दीपक प्रज्वलित झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणातून अतिशय संवेदनशीलता दाखवून दिली.”
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले की, “केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. पण त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पण दीपक पोटे यांनी पुढाकार घेऊन या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संकल्प केला आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दीपक पोटे म्हणाले की, “गेल्या साडेचार वर्षाच्या नगरसेवकाच्या कार्यकाळात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. कोविड काळातही अनेकांना मदत करण्याची संधी मिळाली. पण या काळात हॉस्पिटलमध्ये अनेक अडचणी आल्या. रुग्णालयांतील खर्च अनेकांना परवडणारा नव्हता. यासंदर्भातील तक्रारी नेहमी यायच्या. त्या तक्रारींचे निवारण करण्याचा शक्य त्या प्रमाणात प्रयत्न केला. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘आयुषमान भारत’ योजनेचा फायदा झाला. तेव्हा भविष्यातही अशी स्थिती निर्माण झाल्यास, नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविला आहे.”
यावेळी नगरसेवक जयंत भावे, नगरसेविक माधुरी सहस्रबुद्धे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांनी केले. १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन मानले.



