“उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही” : अमृता फडणवीस

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, असं मत व्यक्त केले आहे.
उर्फी जावेद-चित्रा वाघ वादाबाबत विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, “चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे की, काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते ठीक नाहीये. उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं.”

“याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाई करत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीने जिथे प्रोफेशनली कमेंटमेंट नाही. तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचं झालं तर… उर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करतेय. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.









