वटपौर्णिमेनिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे वटवृक्षाच्या रोपांचे वाटप..पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

पुणे : वटपौर्णिमेच्या निमित्ताने शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड परिसरातील माता-भगिनींना वटवृक्षाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
यावेळी शिवगर्जना प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा श्वेता अमित तोरडमल म्हणाल्या, “वटपौर्णिमा हा महिलांसाठी श्रद्धा, संस्कृती आणि सौभाग्याचे प्रतीक असलेला महत्त्वाचा सण आहे. या निमित्ताने माता-भगिनींना वटवृक्षाचे रोप भेट देण्याचा उपक्रम प्रतिष्ठान गेली तीन वर्षे सातत्याने राबवत आहे. केवळ रोपांचे वाटप न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहनही आम्ही करीत आहोत. आपल्या सौभाग्यासोबतच निसर्गाचेही रक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास शिवगर्जना प्रतिष्ठानचे रोहित तोरडमल, चिन्मय चव्हाण, महेश लाड, कृष्णा राठोड, आशिष सांगळे, आतिश तोंडे, सुभाष गायकवाड, साई थोरवे, ओम धावडे, राजेंद्र पोळ, कुणाल नायडू, शुभम येडे, प्रदीप जोरी, शुभम कनिच्छे, आशिष कनिच्छे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



