स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, फक्त मुंबईत एकत्र तर पुण्यात भाजप स्वबळावर?

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
त्यानसुार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करुन निवडणूक लढवले. मात्र, अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील, अशी रणनीती महायुतीने आखली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मविआला व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मविआच्या उमेदवारांना होऊ शकतो. हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी मुंबईत महायुती एकत्र लढेल, असे संकेत दिले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणारी मुंबई महानगरपालिका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे.



मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. या दोघांचे आव्हान महायुती कशाप्रकारे परतवून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायेच हे आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



पुण्यात कशी होणार निवडणूक?
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. याला राज्यातील नेत्यांनी देखील दूजोरा दिला असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणूक महा युतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्ररित्या लढविणार असल्याचे बोलले जात आहे.



ठाणे महानगरपालिकेतील परिस्थिती काय?
ठाणे महानगरपालिकेचा विचार करता 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. यामध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले होते. शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. तर भाजपचे फक्त 23 नगरसेवक निवडून आले होते. दरम्यानच्या काळात ठाण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे. या घडीला शिवसेनेकडे 85 माजी नगरसेवक आहेत. ज्यांनी वेगवेगळ्या पक्षातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर भाजपकडे सध्याच्या घडीला 23 माजी नगरसेवक आहेत.



त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यास स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे आमदार संजय केळकर, गणेश नाईक हे ठाण्यात एकनाथ शिंदेंची कोंडी करताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप निवडणुकीत वेगवेगळे लढल्यास महायुतीमध्ये मतांची विभागणी होऊ शकते. याउलट महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.




























































