मोदीजी, माफी मांगो; राज्यात कॉंग्रेसचं आंदोलन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी तसंच काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. महाराष्ट्रातून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवल्याने करोनाचा प्रसार झाला, अशा आशयाचं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. याविरोधात आता महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी आणि मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यभरातल्या भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. पटोले म्हणाले, “जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. प्रत्येक जिल्ह्यात भाजप कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातले नेते, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील असतील. ते मोदींच्या वक्तव्याचं समर्थन करत असतील तर त्यांनी जाहीर करावं. ते महाराष्ट्रद्रोही ठरतील. त्यामुळे महाराष्ट्र भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.”
यावेळी जमावाने पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तसंच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. मोदी ते तानाशाही नही चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, अशी घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.



