८ मार्च महिला दिन विशेष- महिलांसाठी गुंतवणूक आणि गुंतवणुकीच्या नियोजनाचे महत्व- सौ.यामिनी मठकरी (आर्थिक नियोजन आणि विमा सल्लागार)

आपले आर्थिक गुंतवणूकीचे नियोजन कसे, कुणी आणि का करावे ? यावर प्रश्न उत्तररुपी माहिती.
१) महिलांनी आर्थिक गुंतवणूकीचे नियोजन कसे, कुठे आणि कधी करावे ? याला कुठल्या वेळेची, वयाची बंधन आहेत का?
उत्तर — ज्या क्षणाला माहिती मिळाली त्या वेळेपासून आपण कधीही सुरवात करू शकतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीची गुंतवणूक आणि छोट्या रकमेपासून ते मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीपर्यंत, अगदी कर नियोजनापर्यंतचे संपूर्ण नियोजन आपण करू शकतो, याला वयाचे बंधन नाही.
२) नियोजन महत्वाचे आहे का ?
उत्तर – हो तुमचा प्रत्येक पैसा कमी किंवा जास्त हा विचार करण्यापेक्षा आहे तो कसा योग्य नियोजनपूर्वक गुंतवणुकीतून वाढवता येईल, आणि आपले आर्थिक ध्येय कसे साध्य करता येईल यासाठी नियोजन महत्वाचे आहे.

३) घरातील गुंतवणूकीचे नियोजन हे फक्त पुरुषांनीच करावे का? महिलांनीही यात सहभाग घ्यायला हवा का ? दोघांपैकी नेमके कोण याचे नियोजन उत्तमप्रकारे करू शकते?
उत्तर – घरातील आर्थिक नियोजन ही पूर्णपणे दोघांची जबाबदारी आहे, रोजच्या आयुष्यात घरातील सर्वच नियोजन महिला करतात अगदी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडत महिला बाहेरही आपल्या पायावर उभ्या राहून घराला आर्थिक हातभार लावतात.
काही घरांमध्ये पुरुषही नोकरी,व्यवसाय करून घरातही जातीने लक्ष देऊन अगदी स्वयंपाक घरातही आवडीने मदत करतात.
त्यामुळे दोघांनाही सर्व गोष्टींची जाणीव आणि त्या कामांमधील आव्हाने काय? हे व्यवस्थित आणि बरोबरीने माहीत असते.
त्यामुळेच नियोजनात दोघांचाही सहभाग महत्वाचा आहे, आणि याप्रकारे नियोजन केल्याने, आपली आर्थिक उद्दिष्ट्ये आपण योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे साध्य करू शकतो.



४)नियोजन करताना कुठल्या ध्येयाचा विचार प्रथमदर्शनी करावा आणि कुठला शेवटी हे कसे ठरवावे,याचे कुठले मापक असते का?
उत्तर- हो याचे मापक नक्कीच असते, कारण गुंतवणूक ही एकाच प्रकारची नसते आणि नसावी. त्याचे अनेक पैलू आहेत जसे की,
गुंतवणूक का? कोणासाठी? किती वेळेसाठी – वर्षांसाठी करतोय.
नेमका कुठले ध्येय त्यातून पूर्ण करायचेत,
या गुंतवणुकीची सुरवात कधी करायला हवी, आणि किती पैशांची गुंतवणूक असावी. यासाठी मापक गरजेचे आहे.
५) गुंतवणूक करताना कुणाचा सल्ला घ्यावा आणि का? घरच्यांचा, मित्रमंडळींचा,का तज्ञांचा?
उत्तर – गुंतवणूक हा विषय सर्वात जास्त महत्वाचा आहे, कारण पैशांच सोंग आणता येत नाही, पावलोपावली आपल्याला पैसा लागतो, अस म्हणता येईल की पैशानेच सगळ होत आहेरे.. दिवसातल्या २४ तासांत आपण करत असलेल्या प्रत्येक जीवनावश्यक गोष्टींचा विचार केला तर प्रत्येक क्षणाला अनेक माध्यमातून पैसा देतच असतो .
पैसा देत असताना रोजच्या जीवनावश्यक गोष्टी गरजा आपल्याला माहीत असतात…. पण पुढे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण, लग्न,आपण आता जगतोय तशी आणि रोज बदलत जाणारी आपली जीवनशैली, अचानक येणारी संकटे बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार किंवा बदलत्या काळानुरूप रोजच्या मौजमजेच्या आणि अनावश्यक असणारे, पण आपले स्टेटस जपण्यासाठी होणारे खर्च,
आपण आता जगतोय तसच आपल्याला म्हातारपणातही आनंदाने रोजचे जीवन जगता येण्यासाठी, आणि त्यावेळी येणाऱ्या तब्बेतीच्या किंवा इतर काही समस्यांसाठीचे नियोजन हे आजच करायला हवे.
आपण या सर्व विषयावर विचार केला का? आणि केला तर आपल्याला त्यातली संपूर्ण माहिती आहे का ? तर नाही… सर्वांनाच ती माहिती नसते किंवा जी असते ती पूर्ण नसते.
जसे प्रत्येक आजारावर त्या त्या विषयातले तज्ञ डॉक्टर्स असतात, तसेच गुंतवणुकीवर मार्गदर्शन करणारे तज्ञ गुंतवणूक सल्लागारही असतात. आपण आपले आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी नक्कीच त्यांचा सल्ला घेतला पाहिजे .
६) गुंतवणूक सल्लागाराची गरज काय ?? माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी सल्ला दिलाय कुठे रिटर्न्स जास्त आहेत, त्यामुळे आम्ही तिथेच गुंतवणूक करू… हा विचार योग्य आहे का?
उत्तर – गुंतवणूक सल्लागाराची गरज नक्कीच आहे. इतर कोणाचंही ऐकून गुंतवणूक करण्याचा विचार अगदी चुकीचा आहे.
कारण एकच घरात आपण वाढतो तरी प्रत्येकाच्या गरजा, सवयी, जीवनशैली, सगळच वेगळा असता.
जीवनात प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात, एकाच घरात आपल्याला आजार जरी सारखा असला तरी औषध वेगळी दिली जातात.
आपण कोणालाही दिलेलं औषध घेत नाही बरोबर ना ?
तसच एकाच घरात राहून जर आपण इतके वेगवेगळे असतो, तर आपले आर्थिक ध्येय कसे सारखे असतील आणि त्यामुळे इतरांनी केलेल्या गुंतवणुकी तुमच्यासाठी कश्या योग्य असतील? कोणाचही ऐकताना किंवा अर्धवट माहिती घेऊन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला खूप महत्वाचा आहे .



७) गुंतवणूक नियोजनामुळे रोजच्या जीवनात काही बदल होईल का?
उत्तर – आपण रोजच्या जीवनात प्रत्येक दिवसाचे आणि इतर सर्वच गोष्टींचे नियोजन करतो, जर आपण दिवसाचे नियोजन केले नाही तर वेळ, पैसा, आणि महत्वाच्या गोष्टी सगळच अनुपयोगी होते.
तसच पैसा मिळवण्यासाठी आपण शारीरिक मानसिक कष्ट करत असतो.
घरच्यांना देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो, कारण दिवसातले १३ ते १४ तास आपण फक्त पैसा कमावण्यासाठी देतो, आणि ज्यासाठी तुम्ही इतका वेळ देता,
कष्ट करता त्या पैशांना योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास तुम्ही शांततेने, कुठलाही ताण न घेता रोजचे जीवन जगू शकता.
योग्य गुंतवणूक नियोजनाने तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंगही आजच करू शकता. तज्ञांच्या सल्ल्यामुळे तुम्ही जेव्हा पुढे जात असता, तेव्हा नेमका किती पैसा लागणार आहे आणि तो किती वेळेत कमवावा लागेल, आणि कुठल्या कामासाठी किती वेळ द्यायचा आहे हे समजेल.
तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी, कुटुंबाला वेळ देण्यासाठी इतर सर्वच गोष्टींसाठी तुम्ही नियोजनाने विनाताण पुढे जावू शकता.
अतीताणामुळे होणाऱ्या बऱ्याचश्या आजारांपासून तुम्ही दूर राहाल व एक निरोगी आनंदी जीवन जगाल.
८) गुंतवणूक नियोजनात महिलांचे योगदान किती महत्वाचे आहे?
उत्तर – हे आर्थिक गुंतवणूकीचे नियोजन तुमच्या जीवनातील ९०% समस्या दूर करते. तर यासाठी महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने पुढाकार घेणे जास्त आवश्यक आहे.
कारण आयुष्य जगताना जसे दोघे मिळून घर चालवण्यासाठी कष्ट करतात, तसेच दोघेही घराचा आधारस्तंभ आहेत.
महिलांना पुरुषांच्या तुलनेत काही जास्तच जबाबदाऱ्या असतात, पण या आर्थिक नियोजनामुळे एकावरच जबाबदाऱ्यांचा भार येत नाही.
आणि दोघांनाही एकमेकांच्या कामाची जाणीव असल्यामुळे आणि बरोबरीने नियोजनात सहभागी झाल्यामुळे कुटुंबावर येणारे बिकट प्रश्न व जबाबदाऱ्या नियोजनपूर्वक, खंबीरपणे पार पाडता येतात.
सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सौ.यामिनी मठकरी
8805601068
(आर्थिक नियोजन आणि विमा सल्लागार)
पुणे ३८



