माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले (वय ८५) यांचे हृदयविकाराचा झटक्याने सोमवारी राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी सुजाता, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. जुन्या पिढीतील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य स. वा. कोगेकर यांचे गोडबोले हे जावई होत.
रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात गोडबोले केंद्रीय गृहसचिव होते. राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी बाबरी मशिदीचे जतन करणे आवश्यक आहे अशो त्यांची धारणा होती. यासंदर्भात गोडबोले यांनी वारंवार तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र, बाबरी मशिदीचे पतन रोखता आले नाही यामुळे व्यथित होऊन गोडबोले यांनी गृहसचिव पदाचा राजीनामा दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माधव गोडबोले यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. “माधव गोडबोले हे महाराष्ट्राचे अत्यंत कतृत्वान असे अधिकारी होते. त्यांचा खरा परिचय लोकांना झाला, यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना, परराष्ट्रमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून यांनी काम केलं होतं. यशवंतराव चव्हाणांच्या देशभरातील दौऱ्यात ते नेहमीच त्यांच्यासोबत असायचे. महाराष्ट्राच्या मंत्रालयात त्यांनी अनेक वर्षे काम केलं. माझ्यासोबतही काम केलं, ते अर्थ विभागाचे सचिव होते. एक स्वच्छ, अत्यंत स्पष्ट. वेळप्रसंगी आम्हा लोकांच्या मतावर देखील आपली भूमिका परखडपणाने मांडायला न कचरणारे, असे एक अधिकारी म्हणून त्यांचा परिचय होता. देशाच्या गृह खात्याची जबाबदारी त्यांनी सचिव म्हणून सांभाळली होती. अत्यंत कठीण परिस्थितीतून देखील मार्ग काढण्यासाठी त्यांनी अतिकष्ट घेतले होते. आज एका चांगल्या अधिकाऱ्याला महाराष्ट्रच नव्हे तर देश मूकला आहे.” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.




