बाळासाहेबांचे ऐकणार की शरद पवारांचं ? राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना प्रश्न

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिथं अनधिकृत भोंगे तिथं हनुमान चालिसा लावा. त्यांनाही कळू दे त्रास काय असतो असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे. तर भोंग्यांवर बांग ऐकू येताच पोलिसांना फोन करुन तक्रारी द्या असं आवाहन देखील राज ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे उतरवा असं सांगितलं होतं तर बाळासाहेबांचं ऐकणार की शरद पवारांचं असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या 1 मे रोजीच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. शिवाय 4 तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबरोबरच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा देखील पाठवल्या आहेत. तरी देखील राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत.




