सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिकेवर संध्याकाळी ५ वाजता तातडीची सुनावणी

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं सांगत शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर संध्याकाळी ५ वाजता तातडीची सुनावणी घेतली जाणार आहे. शिवसेनेकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत. त्याचबरोबर भाजपनं आपल्या आमदारांना आज मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यपालांचे आदेश घटनाबाह्य – उल्हास बापट
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच वागावं लागतं. राष्ट्रपती जसे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतात, तसंच राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार वागावं लागतं. सत्र बोलावणं, सत्राचा शेवट करणं आणि विसर्जित करणं या गोष्टी राज्यपालांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच बोलवता येतात. त्यामुळे आत्ता राज्यपालांनी जे आदेश दिले आहेत, ते घटनाबाह्य असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.
सिल्व्हर ओकवर बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी अर्थात सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र. या बैठकीला शिवसेना नेते अनुपस्थित असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.




