कोथरूडमधील महात्मा सोसायटीत खिडक्यांवर दगडफेक,5 ते 6 नागरिक जखमी; दहशत निर्माण करीत चंदन वृक्षाची चोरी,मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घराजवळील गंभीर घटना

पुणे : कोथरूड मधील महात्मा सोसायटीतील श्रीनिवास गार्डन मध्ये गुरूवारी रात्री साडे बाराच्या सुमारास चंदन तस्करांनी दगडाने हल्ला करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत चंदनाच्या वृक्षाची चोरी केल्याचा गंभीर घटना घडली आहे. कोथरूड चे आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर हि धक्कादायक घटना घडली आहे.
या घटने मध्ये सोसायटीचा वॉचमन गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. तर चोरांनी गिलोरी च्या साहाय्याने केलेल्या दगड फेकी मध्ये खिडक्यांच्या काचा फुटुन पाच ते सहा नागरिक जखमी झाले आहेत. नागरिकांनी या प्रकरणी कोथरूड पोलीसांकडे तक्रार केली आहे.

गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास 8 ते 10 चोरटे श्रीनिवास गार्डन सोसायटी समोर आले. यावेळी सोसायटीचा दरवाजा बंद होता. हा दरवाजा उघडण्यासाठी चोरट्यांनी वॉचमन वर हल्ला केला. या हल्ल्यात वॉचमन जखमी झाला. यावेळी वॉचमन ने आरडा ओरडा केल्याने सोसायटी मधील नागरिकांनी खिडक्या उघडल्या. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या जवळ असलेल्या गीलोरी मधून दगडी मारल्या यामध्ये पाच ते सहा नागरिक जखमी झाले. त्यामूळे नागरीकांमध्ये घबराट निर्माण झाली. या संधीचा फायदा घेत चोरटे चंदनाचे झाड तोडून गाडी मध्ये भरून पसार झाले.
कोथरूड चे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर हा प्रकार घडला. पाटील यांच्या घरा जवळ चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतो. मात्र तरी देखील चोरट्यांनी या परिसरात दहशत निर्माण करीत चंदनाची चोरी केली. पोलिसांचा धाक कमी झाल्याने असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबत बोलताना स्थानिक नागरिक आनंदराव शिंदे म्हणाले, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या घटने मुळे आमच्या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. याबाबतीत पोलीसांकडे तक्रार केली आहे. गेल्या चार वर्षांपुर्वी देखील या भागात चंदनाची चोरी झाली होती. पोलिसात तक्रार करुन हि अद्याप त्याबाबत काहीच झाले नाही.



माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे म्हणाले, हा अतिशय गंभीर प्रकार असून मी घटना स्थळी पोहचून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या चंदन तस्करांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी. तसेच असा प्रकार पुन्हा होणार नाही या बाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.









