‘बिहारची जनता नितीशकुमारांना
रिटायर करेल ‘

मुंवई: बिहार विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी ७८ मतदारसंघात मतदान होत आहे. या शेवटच्या दिवशीही नेत्यांमध्ये एकमेकांवर शेरेबाजी चालू आहे.
बिहारचे मुख्य मंत्री आणि जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. माझी ही निवडणूक शेवटची आहे, असे ते म्हणाले. त्यांचे विधान उचलून धरत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले, “नितीशकुमार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांनी सन्मानाने निवृत्त व्हावे अशी आमची इच्छा आहे. बिहारच्या जनतेचीही तीच इच्छा आहे. बिहारची जनता त्यांना निवडणुकीद्वारे रिटायर करेल” मतदानाच्या दिवशी सकाळीच राऊत यांनी हे खोचक ट्विट केले.

सुशांत रजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली. त्याचे पडसाद बिहारच्या निवडणुकीत उमटले. भाजप आणि नितीशकुमार यांची आघाडी आहे त्यामुळे आज शेवटच्या दिवशीही नितीशकुमार यांना टोला लगावण्याची संधी राऊत यांनी सोडली नाही.






