असे जोडले रक्ताचे रक्ताशी नाते..

पुणे- करोना आजाराच्या वाढत्या संसर्गात माणुसकी जपत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निस्वार्थीपणा दाखवत रक्तदानाबाबत जनजागृती करत मागील आठ महिन्यात ज्यांनी शेकडो प्राण वाचविले आहेत अशा राम बांगड यांचे रक्तदाना संदर्भातील जनजागृतीचे काम कौतुकास्पद आहे.
गुरुवार पेठेमध्ये ‘रक्ताचे नाते’ नावाने सुरू असलेल्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. रक्तदाते वाढविण्यासाठी महाराष्ट्रभर तसेच इतर राज्यात देखील शिबिरे घेऊन रक्तदानाचे महत्व समजावून सांगण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. गरजूंना मोफत रक्त मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.
मागील काही महिन्यात करोना आजाराच्या भीतीने अनेक जणांनी इच्छा असूनही रक्तदानाकडे पाठ फिरवली मात्र त्यांना समजावून सुरक्षितपणे रक्तदान करण्यास प्रोत्साहन रक्ताचे नाते संस्थेने केल्यामुळे अनेक थांबलेली ऑपरेशन होऊ शकली. रक्ताचे नाते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम बांगड म्हणाले की, परदेशात रक्तदात्यांना सामाजिक न्याय दिला जातो. विशेष सन्मान दिला जातो. आपल्याकडे मात्र करोनाच्या भीतीमुळे रक्तदात्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याची अनेकांची तक्रार येत आहे.

बांगड यांनी स्वतः रक्तदान १३२ वेळा केले असून प्लेट लेट्स दान २१ वेळा केले आहे. तसेच ६ वेळा प्लाझ्मा दान ही केले आहे. “बऱ्या झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य, हेच माझे बक्षीस…” असल्याचे बांगड म्हणतात. १९७६ साली झोपडपट्टीत एका लहान मुलीच्या अंगावर भिंत पडली आणि त्यावेळी लोकांची झालेली रक्तासाठी धावपळ आणि अगतिकता न कळत मला या कार्यात ओढून आणण्यात कारणीभूत ठरली असल्याचे ते सांगतात. आज मितीला बांगड यांनी स्थापन केलेल्या रक्ताचे नाते संस्थेत ५० हजारांपेक्षा जास्त रक्तदाते आहेत. ते २२ जिल्हात आणि १५ राज्यात पसरलेले आहे.



रक्तपेढ्या रक्तदान शिबिरे घेऊ शकत नसताना अनेक रक्तदात्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले आहे. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता हे जीवनदान देण्यासाठी रक्तदाते वेळेला धावतात. त्यांना योग्य सन्मान द्यायला हवा. अनेक जण जन्मदिवस, विशेष दिवस तसेच आपल्या आवडत्या माणसाच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणीत रक्तदान करतात.



वाढदिवसाच्या निमित्त प्लेटलेट्स दान करणारे गजानन सोनवणे म्हणाले की, मी प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान किंवा प्लेटलेट्स दान करतो. यातून सामाजिक बांधिलकी पूर्ण करत असल्याचा, तसेच कोणाचा तरी जीव वाचविण्यासाठी आपली मदत झाल्याचा आंनद मिळतो.
विज्ञान प्रगती करत असले तरी, वेळेला रक्ताची गरज ही मनुष्यच पूर्ण करू शकतो. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी परिपूर्ण असलेल्या व्यक्तीने निस्वार्थीपणे पुढाकार घेऊन रक्तदान करावे. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यास ही त्याचे मोठ्या प्रमाणात शारीरिक फायदे भविष्यात होत असतात.
“सध्या शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून रक्तदात्यांनी पुढाकार घेत मोठ्या संख्येने रक्तदान करावे” असे आवाहन बांगड यांनी केले आहे.



