पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ, निर्बंधांबाबत निर्णय दोन आठवड्यांनंतर : अजित पवार

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या अर्धवेळ भरवल्या जात होत्या. त्या आता पूर्णवेळ भरतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पुण्यात अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

जंबो कोवीड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा नाही. विरोधी पक्षातील लोक आरोप करतात, पण पुढे त्याच काय होतं. अनेकदा माफी मागुन मोकळे होतात असे अजित पवार म्हणाले. सुशील खोडवेकरला टीईटी परिक्षेतील गैरव्यवहारात अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यानी याची माहिती घेतली आहे. माहिती घेणं हे मुख्यमंत्र्यांचे काम असल्याचे पवार यांनी सांगितले. येरवड्यातील शास्त्रीनगर येथील इमारत दुर्घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देखील या अपघाताबाबत अहवाल देण्यास सांगण्यात आल्याचे पवार म्हणाले आहेत.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे पण मृत्यूच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. पुण्यात, राज्यात, देशात आणि जगात हा ट्रेंड दिसून येतोय. 5 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यासाठी जेवढी लस हवी तेवढी उपलब्ध नाही. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
जंबो कोवीड सेंटर सध्या उभे आहे, पण त्यामध्ये रुग्ण नाहीत. मात्र, तरीही 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ कारण त्यासाठी भाडे द्यावे लागते असे पवार यांनी सांगितले. पुण्यात अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले.



