लोकशाहिच्या मुल्यजतनांसाठी यशंवतरावांच्या विचाराचा जागर व्हावा : – सुशिलकुमार शिंदे

पुणेः- जातीव्यवस्था मोडकळीस आणून समानतेचे मूल्य रुजावे म्हणुन यशवंतराव चव्हाण आयुष्यभर आग्रही होते. अलीकडे जाती-जातीत भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारी राजकीय पिढी दिसली की खंत वाटते. लोकशाहीच्या मूल्य जतनासाठी य़शवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा यशवंत-वेणू सन्मान यंदा महाराष्ट्र राज्य पदवीधर मतदार संघ नाशिक विभागाच्या विधान परिषदेचे आमदार डाॅ.सुधीर तांबे आणि संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक आणि राजकीय युवा कार्यकर्ते स्वप्नील दुधाने यांना यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्काराने, प्रगतिशील शेतकरी धनंजय पवार याना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वीरगावच्या सरपंच प्रगती वाकचाैरे यांना यशवंतराव चव्हाण युवती पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सर्व पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण, आण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे आदीमंडळींनी विचारांचा यज्ञ मांडला होता. या मंडळीमध्ये काही वेळी मतभेद झाले असतील पंरतू त्यांनी मनभेद कधी होऊ दिले नाहीत. प्रत्येकाच्या विचारसरणीचा त्यांनी त्यांच्या चौकटीत राहून आदरच केला.
ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे त्यांच्या मनोगतात म्हणाले, वेणुताई यशवंतरावांच्या सावली होऊन वावरल्या. दोघांनी आयुष्यभर स्वतःचे अस्तित्व राखत एकमेकांच्या विचारांचा आदर केला. आज य़शवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत महाराष्ट्र दिसत नाही. शेतकरी उध्वस्त झाला असून कामगार देशोधडीला लागला आहे. असे असतांना हे राजकीय मंडळी एकमेकांचे उणेदुणे काढण्यांत गुंतली आहेत, मग्न आहेत. यांना सर्वसामान्यांच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांशी काही देणे-घेणे आहे की नाही असा प्रश्न पडावा असे यांचे वर्तन आहे.



उल्हास पवार म्हणाले, राजकारणात अपप्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे.द्वेषाचे, मस्तराचे आणि पाहून घेईल असे राजकारण सुरु आहे. आज गांधी आहेत पंरतू महात्मा नाही, आज पंडित आहेत पंरतू जवाहरलाल नाहीत.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले आणि पुरस्कार्थी उपस्थित होते..कवी राजेंद्र वाघ यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची अधोरेखीत करणारे यशवंत गीत सादर केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी यशंवत वेणु पुरस्कार प्राप्त द्वियींनी तसेच इतर पुरस्करप्राप्त पुरस्कारार्थींनी थोडक्यात मनोगते व्यक्त केली.
कवी उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रवींद्र डोमाळे यांनी आभार मानले.



