अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्ह्याचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कॉलरशिप प्रदान..

शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा व गुरुजनांचा आदर्श ठेवावा – मेधा कुलकर्णी
पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, तसेच समाजातील गरीब हुशार मुलांना भगवान परशुराम शैक्षणिक स्कॉलरशिप देण्याचा कार्यक्रम केसरी वाडा पुणे येथे उत्साहात पार पडला. पुणे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या 175 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच ब्राह्मण समाजातील १८ गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. केवळ फी अभावी मुलांचे शिक्षण थांबू नये हा उद्देश या पाठीमागे होता.
या कार्यक्रमासाठी राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, युवा नेते कुणाल टिळक , डॉ. महेश चिटणीस ,एमआयटी कॉलेज चे रत्नदीप जोशी, प्राचार्य वंदन जोशी असे मान्यवर तसेच पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, केतकी कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांचा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह व पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी यांनी समाजातील अनेक यशस्वी उदाहरणे सांगून मुलांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा व गुरुजनांचा आदर्श ठेवावा असा सल्ला दिला.



‘माझा डॉक्टर’ या कार्यक्रमातील डॉ महेश चिटणीस यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कार्यपद्धती व करिअर याबद्दल चे मार्गदर्शन केले. लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक (भाजप युवा नेते) यांनी त्यांचे शैक्षणिक अनुभव, येणारी आव्हाने यासाठी कानमंत्र दिला. एमआयटी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक रत्नदीप जोशी व प्राचार्य वंदन जोशी यांनी करिअर बद्दल मार्गदर्शन केले.



डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिल्लीतील ब्राह्मण भवन निर्माण संबंधी माहिती दिली, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना “मुलांनो भरपूर शिका व नोकरीची चिंता आमच्यावर सोडा” असे आवाहन केले व पुणे जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा सांगितला, केतकी कुलकर्णी यांनी मुलांचे अभिनंदन करून विंदा करंदीकर यांच्या कवितेचा आधार देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गौरव चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे उपक्रमाचे सलग चौथं वर्ष होते व यनिमित्ताने अनेक गरीब विद्यार्थ्यांचे थांबलेले शिक्षण पूर्वव्रत सुरू झाले आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन गीता देशमुख यांनी केले , आभार ऋषिकेश गोरे याने मांडले.






