भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

पुणे : सलग सहावेळा शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे आणि त्यातील दोन वेळा विजय प्राप्त करणारे माजी आमदार बाबूराव काशीनाथ पाचर्णे (वय ७१) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले पूत्र राहुल पाचर्णे, एक मुलगी, जावई कर्नल महेश शेळके, नातवंडे, चार भाऊ, पाच बहिणी असा परिवार आहे. पाचर्णे यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यात आणि शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
विधानसभा निवडणूकीदरम्यानच त्यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणूकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले. परंतू दीड वर्षांच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि अखेर आज शिरूर येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
तर्डोबाची वाडी या एका छोट्याशा वाडीतील शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या बाबूराव पाचर्णे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. राजकारणात कुणीही मार्गदर्शक नसताना त्यांनी गावपातळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केली व थेट तालुक्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. शिरूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात झाली. सन १९७८ ते ८४ या काळात ते ग्रामपंचायत सदस्य होते. पुढे, शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवित त्यांनी तालुका पातळीवरील राजकारणात प्रवेश केला. २८ जानेवारी १९८५ ते २२ जुलै १९९३ अशी सलग आठ वर्षे बाजार समितीचे सभापतीपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली. या काळात त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. भव्य दिव्य व्यापारी संकुल उभे करून शेतकऱ्यांच्या मुलांना विविध व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून दिले. १९९३ ला झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत ते पुन्हा संचालक म्हणून निवडून आले. तत्पूर्वी, १९९२ च्या पंचायत समिती निवडणूकीत एकतर्फी विजय मिळाल्यानंतर तेच सभापती होतील, असे चित्र होते. मात्र, राजकीय तडजोडीत त्यांची संधी हुकली. पुढे १९९५ ला त्यांनी प्रथम विधानसभेची निवडणूक लढविली. जवळपास निश्चीत झालेली कॉंग्रेसची उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून प्रबळ आव्हान उभे केले होते. त्या निवडणूकीत केवळ ६७८ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. १९९९ ची निवडणूक त्यांनी कॉंग्रेसकडून लढविली, मात्र त्या निवडणूकीतही त्यांना यश मिळाले नाही. दोन वेळा यशाने हुलकावणी दिल्यावर २००४ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा अपेक्षेप्रमाणे उमेदवारीबरोबरच यशही त्यांच्या पदरात पडले. २००९ च्या निवडणूकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढविली आणि तेथेही त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपत प्रवेश केला आणि उमेदवारीबरोबरच पुन्हा यशही खेचून आणले. राजकीय कारकिर्दीतील शेवटच्या ठरलेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीतही त्यांना अपयशाचेच तोंड पहावे लागले.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक असलेल्या पाचर्णे यांनी १९९७ ते ९९ या काळात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या पाचर्णे यांनी विविध शैक्षणिक – सामाजिक संस्थांवर प्रतिनिधीत्व केले. काही काळ त्यांनी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपदही भूषविले.










