धार्मिक मुद्द्यांवरून तणाव निर्माण होणे अशोभनीय : शाहू महाराज

कोल्हापूर : काही महाविद्यालयीन युवकांनी मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तणाव निर्माण झाला. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी यावर नाराजी व्यक्त केली. धार्मिक मुद्द्यांवरून तणाव निर्माण होणे राज्यासाठी आणि कोल्हापूरसाठी अशोभनीय असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक सलोखा हा कोल्हापूरच्या विकासाचा गाभा आहे. आपण २१ व्या शतकात वावरत आहोत. अशावेळी पूर्वजांचे, शिवरायांचे विचार आणि शिकवण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरात यापूर्वी असे कधी झाले नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहखात्याची
प्रत्येकाने परस्परांशी सलोख्याने राहिले, वागले पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही शासनाची आणि गृहखात्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत वेगवेगळ्या शहरात अशा सलग झालेल्या घटनेबद्दल ‘काही लिंक आहे का?’ अशी शंका उपस्थित करून त्यांनी चौकशीची मागणीही केली.



लोकराजा छत्रपती शाहु महाराजांच्या या अलौकिक अशा करवीर नगरीत तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली, याची मनाला वेदना होत असल्याचे त्यांनी सांगितले. तणावाच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना आपण स्वतः फोन केला. काही गरज वाटली तर आपण स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना शांत राहण्यास सांगायला तयार असल्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले होते; पण त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसावी. त्यामुळे त्यांनी आपल्याला काही प्रतिसाद दिला नसावा, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश म्हणावे लागेल का, यावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी एकाच व्यक्तीला या प्रकरणावर जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे सांगितले.



