‘युवकांना संधी देणारा देश म्हणून भारताचे ब्रॅण्डिंग व्हावे’- डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे उद्गार; भाजप आणि संस्कृती प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ

पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेची कुठेही कमी नाही. या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, हे देशाच्या आणि समाजाच्या हातात आहे आणि ते झाले की भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने पुढे जाऊ शकेल. शिवाय युवकांना सर्व क्षेत्रात संधी देणारा देश म्हणून भारताचे ब्रॅंडिंग व्हावे, असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
भारतीय जनता पार्टी आणि संस्कृती प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात डॉ माशेलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकात पाटील होते. तर तर व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, संयोजक मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड आणि वासंती जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी दहावी आणि बारावीतील सातशेहून अधिक गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, अमेरिकेने स्वतःचे ब्रॅण्डिंग ‘लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी’ असे केले आहे. आणि आपल्या भारताकडे ‘ लँड ऑफ आयडियाज’ म्हणून पाहिले जाते. पण, आपल्या देशाचे नाव हे सुद्धा ‘लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज’ असेच झाले पाहिजे. म्हणजे, भारतामधील कल्पना आणि भारतामध्येच संधी, असे विद्यार्थ्यांचे करियर बनू शकेल’
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘सलग २१ वर्षे सातत्याने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा उपक्रम सुरु असून राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करण्याची भूमिका मुरलीधर मोहोळ यांनी निभावली आहे.
संयोजक मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असतात. या टप्प्यांवर मिळालेले यश नक्कीच कौतुकाचा थाप टाकण्यास पात्र असते. या भावनेतून गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत’












