ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका (Serial), सिनेमे (Movies) आणि वेबसीरिजमध्येही (Web Series) ते झळकले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून जयंत सावरकर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. पण नंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं.



जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी जयंत सावरकर यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. ‘अपराध मीच केला’ (गोळे मास्तर), ‘अपूर्णांक’, ‘अलीबाबा चाळीस चोर’, ‘अल्लादीन जादूचा दिवा’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’ अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. ‘एकच प्याला’ नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली.



