शूरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळाचा विकास आराखड्यात समावेश करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे प्रशासनास निर्देश

कोरेगाव भीमा : छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत्यविधी करणारे शूरयोद्धा गोविंद गणपत गायकवाड यांचे वढु बुद्रुक (ता शिरूर जि. पुणे) येथील समाधीस्थळ उपेक्षित आहे. या समाधीस्थळी भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आंबेडकरी समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ तुळापूर, वढु बुद्रुक येथील विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३०२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या विकास आराखड्याचे काम सुरू असून या विकास आराखड्यात शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधी स्थळाचा समाविष्ट करण्यात यावा, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी दिनांक ३१ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या तुळापूर, वढु बुद्रुक येथील समाधीस्थळी विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांचा तुळापूरच्या सरपंच अॕड. गुंपा इंगळे, वढुचे सरपंच ज्ञानेश्वर भंडारे यांनी सन्मान केला. तसेच त्यांनी शूरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
१ जानेवारी शौर्यदीनी भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी येत असतात ते अनुयायी वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी राजे तसेच शुरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतात.
शौर्यदिनी गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने फुलाची सजावट करुन अभिवादनचे नियोजन करण्यात येते. तसेच अनुयायांना पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, पार्किंगची सोय, आरोग्य सेवा आदी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती रामदास लोखंडे यांनी दिली.

गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधी उपेक्षित असून समाधी स्थळाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरी समाजाची आहे. छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ विकास आराखड्यात गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधी स्थळाचा समावेश करण्याचे निर्देश विधानसभेच्या उपाध्यक्षांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी विकास आराखडा बार्टीने तयार करून शासनास सादर करावा, असे निर्देश दिले.
पांडुरंग गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देऊन गायकवाड कुटुंबियांची विचारपूस केली. गायकवाड कुटुंबीयांच्या वतीने उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पांडुरंग गायकवाड, कोरेगाव भीमाचे सरपंच श्री संदिप ढेंरगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, राजाभाऊ गवदे, रामदास लोखंडे यांच्यासह वढु व कोरेगाव भीमा ग्रामस्थ तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.



