जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या अनेक भूमिकांमध्ये काम केले. रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटक तर 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली.
वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.
वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला. त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला. त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.







