लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” पुरस्कार मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जागतिक दर्जाचे साहित्य आणि कार्य हे समाजासाठी कायमच प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा गौरव त्यांना “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करून करण्यात यावा अशी अपेक्षा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केली. त्यांना भारतरत्न सन्मान मिळावा यासाठी सरकारच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त येरवडा येथील पुणे महापालिकेच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष रावसाहेब खंडागळे, लहुजी वस्ताद स्मारक समितीचे संचालक डॉ. राजू अडागळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक लेखक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्या प्रा. स्नेहा गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील महिला नायिका यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.



यावेळी अण्णाभाऊ साठे स्मारक समिती तसेच लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती या दोन मान्यवर संस्थांचा विधानसभा उपाध्यक्षांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष नामदार बनसोडे यांना मानपत्र व अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे महापालिकेच्या येरवडा येथील स्मारकासाठी आवश्यक सोयी सुविधांसह आवश्यक निधी उपलब्ध करण्याबाबत नामदार बनसोडे यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होत्या. यामधील प्राथमिक कामे पूर्ण करण्यात आली असून इतर उर्वरित कामांच्या संदर्भात पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येईल. येथील स्मारकाच्या सर्व सोयी सुविधा तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसेच या ठिकाणी आगामी काळात भव्य ग्रंथालय,स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रचार आणि प्रसाराचे काम सातत्याने सुरू राहावे यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवावेत. त्यासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नामदार बनसोडे यांनी यावेळी दिले.






कार्यक्रमाचे आयोजन निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष निखिल गायकवाड व संचालक सुमित चौधरी यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे संचालक संदीप सराटे, बाळासाहेब सूर्यवंशी,हर्षल भंडारे, सचिन खंडागळे, निखिल वंजारे यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.



