महाराष्ट्र

पुण्यातील लाचखोर अधिकाऱ्यासाठी राधाकृष्ण विखेंचे शिफारस पत्र; अंबादास दानवेंचा आरोप

मुंबई : जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जास्त रकमेचा मोबदला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने अटकेत असलेले अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिल रामोड यांची पुणे विभागातून बदली करू नये, यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस पत्र लिहिले होते. हे पत्र ट्वीट करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर आणत अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, ‘व्वा रे व्वा विखे पाटील! पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा आठ लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे नाव समोर आले आहे. या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करू नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते. १ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते, रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते,’ असा दावा करत दानवे यांनी विखे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने १० जूनला अटक केली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. रामोड न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या मागणीनुसार, विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या निलंबनाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाऊ नये; तसेच कोणतीही खासगी नोकरी अथवा अन्य व्यवसाय करू नये. विभागीय आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय पुण्याबाहेर जाऊ नये, असंही निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

डॉ. अनिल रामोड यांच्या घरातून सीबीआयने सुरुवातीला सहा कोटी ६४ लाख रुपये आणि कार्यालयातून एक लाख २८ हजार रुपये जप्त केले होते. त्यानंतर सीबीआयने केलेल्या तपासात त्यांच्या स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नावे पाच कोटी ३० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले. रामोड यांनी ही संपत्ती जमवली कोठून, असा प्रश्न सीबीआयने उपस्थित केला. भूधारकांची प्रकरणे निकाली काढताना घेतलेल्या पैशांतून ही मालमत्ता उभी केली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने अधिक तपास करण्यात येत असल्याचे सीबीआयने न्यायालयात म्हटले होते.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये