कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी- मोहन जोशी

पुणे : थंडीच्या दिवसात कोरोना साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे हे लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेत शैथिल्य येऊ न देता ती सज्ज ठेवावी, अशी सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी पालकमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही कमी झालेले आहे. याकारणाने प्रशासनात शैथिल्य येण्याची भिती आहे. मात्र, थंडीच्या दिवसात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आधीच गंभीर स्वरुपाचे आजार असलेले रुग्ण यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात विशेष लक्ष द्यावे लागेल. युरोप खंडातील काही देशात लॉकडाऊन पुन्हा जारी करावा लागला आहे. पुण्यावर अशी वेळ येऊ नये. पण, साथीचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवणे हिताचे ठरेल.

साथीच्या पहिल्या तडाख्यात पुणेकरांचे आतोनात नुकसान झाले. जिवीतहानी झाली. परत लाट आली तर नुकसान अधिकच होईल. साथीच्या पहिल्या टप्प्यात यंत्रणा उभारताना काही दोष राहून गेले. मात्र, रुग्ण संख्या कमी झाल्याने, सध्या थोडी उसंत मिळत आहे. त्यामुळे यंत्रणेत राहिलेले आधीचे दोष दूर करून रोगाच्या प्रतिकारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची आवश्यकता आहे असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.












