राज्यातील शाळा आता दिवाळीनंतर सुरु होणार

मुंबई : केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिलाय. म्हणून आता दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबत नियमावली जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडलीय. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी केली. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागामध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्यास पालकही संमती देणार नाहीत. निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरु करु नये. मागील वर्षी आलेले वेतनेत्तर अनुदान परत गेलंय. हे अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावे, अशी मागणी बैठकीमध्ये केली आहे. संस्थाचालक महामंडळाच्या मागणीची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेऊन 21 सप्टेंबरपासून कोणतीही शाळा सुरु होणार नाही, असे आता स्पष्ट केलं आहे.



