भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारत रत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला होता.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्ष राहिलेले लालकृष्ण आडवाणी हे एकमेव नेते आहेत. पहिल्यांदा ते 1986 ते 1990 आणि नंतर 1993 पर्यंत अध्यक्ष होते. 1998 आणि त्यानंतर ते 2004 ते 2005 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते. खासदार म्हणून 3 दशके त्यांनी संसदेत काम केले. भाजप सरकार आल्यावर आडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात 1999-2004 या काळात ते उपपंतप्रधान होते. राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी 1990 च्या दशकात राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न पुरस्कारची घोषणा करताना म्हटले आहे की, मला कळवायला अतिशय आनंद होत आहे. लालकृष्ण आडवाणीजी यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मी त्यांच्याशीही बोललो आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्वाचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला. संसदेतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.






