कुटुंबातील मुलांपर्यंत, सदस्यांपर्यंत राजकारण पोहोचणं योग्य नाही : बाळासाहेब थोरात

मुंबई : कुटुंबातील मुलांपर्यंत, सदस्यांपर्यंत हे राजकारण पोहोचणं महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही. संजय राऊत यांचा रोष हा असाच आहे. महाविकास आघाडी टिकू नये यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात जो रोष आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

काँग्रेससोबत सरकारमध्ये दुजाभाव केला जात आहे का? अशी विचारणा केली असता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “असं काही मी म्हणणार नाही. प्रश्न आहेत हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून आज ते सोडवले जातील”. महाविकास आघाडीतील मतभेदांसंबधी विचारलं असता ते म्हणाले की , “जरी एका पक्षाचं सरकार असलं तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. आता तीन पक्षांचं सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत”.



काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले सहभागी असतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात 10 मार्चनंतर मोठे बदल दिसतील असं सूचक विधानही केलं आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष आहे. या बाबत ते म्हणाले की, “10 मार्चनंतर काय बदल होणार आहे याबद्दल पक्षाचे अध्यक्षच सांगू शकतील. तेच याबद्दल स्पष्ट सांगू शकतात. ते नेमकं कशा पद्दतीने बोलले याची मला माहिती नाही”.



