पुणे शहर

अण्णा भाऊंची विश्वात्मकता ज्ञानेश्वरांशी संवादी : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे :- जातीच्या भिंती पलीकडचा अण्णा भाऊंचा ऐतिहासिक सुसंवाद आज संस्कृतीच्या विकासाचे अधिष्ठान आहे. प्रतिभावंत आणि कलावंतांना धर्म नसतो. अण्णा भाऊ तर विश्व स्वातंत्र्याचे पाईक होते. एकूणच त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वात्मकता  गौरवून संतत्व पूजले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार प्राप्त दुर्वा एजन्सी तर्फे प्रकाशित आणि प्रसिद्ध व्याख्याते वि.दा. पिंगळे लिखित ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर दुर्वा एजन्सीचे प्रकाशक शैलेंद्र कदम, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे, मसापचे कार्यवाह अॅड.प्रमोद आडकर, क्रांतिसूर्य लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी बोलताना डाॅ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, वर्तमान जगात एकच धर्म आणि एकच महापुरूष पुरेसा नाही. विश्वाच्या कल्याणासाठी बहुसांस्कृतिक एकात्माता महत्त्वाची आहे. शाहीर अण्णांनी त्यांच्या पोवाड्यांमधून मार्क्स, संत ज्ञानेश्वर,  छत्रपती शिवाजीराजे गाैरविले, लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीला वंदन केले आहे. शाहिरांचे प्रचारीक अनुबंध काॅ. डांगे, डाॅ. आंबेडकर, आचार्य अत्रे आणि अगदी अमरशेख पासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत त्यांच्या अर्पण पत्रिकेतून स्वयंसिद्ध आहेत. तेव्हा अण्णाभाऊ विश्वात्मक कलावंत आहेत. 


Img 20220708 wa00011330202002021897215

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून वंचित, शोषित आणि दुर्बळ घटकांचे दुःख आणि व्यथा मांडल्या. अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून विषमता दूर करण्याचे प्रयत्न केले. परंतु, आज भारताच्या सर्वोच्चपदी महिला विराजमान होत असताना नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील शाळेत केवळ मासिक धर्म आला म्हणून वृक्षारोपणासाठी विद्यार्थीनीला रोखले जाते. हा विरोधाभास आजही समाजात दिसून येतो हे विषण्ण करणारे चित्र आहे. 

यावेळी बोलताना  राजेश पांडे म्हणाले की, अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाचे आपण धडे गिरवले पाहिजे. साहित्यातून अण्णा भाऊंना समजून  घेण्याचा आपण प्रयत्न करतो तितकी त्यांच्या व्यक्तीमत्वाची खोली आपल्याला जाणवते. समाजाप्रती संवेदनशीलता, कर्तव्याप्रती सजगता आणि राष्ट्राप्रती प्रेम बाळगण्याची शिकवण अण्णा भाऊंचे साहित्य देते. 


यावेळी पुणे जिल्हा शिक्षणमंडळाचे मानद सचिव संदीप कदम, क्रांतिसूर्य लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले,  अॅड.प्रमोद आडकर आदींनी देखील मनोगत व्यक्त केले. 

लेखक वि.दा. पिंगळे यांनी लेखकीय मनोगत व्यक्त केले,  तर प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी प्रकाशकिय मनोगत व्यक्त केले.  देवेश सू्र्यवंशी यांनी सुत्रसंचलन केले 

शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे पुण्यात आगमन

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये