झोपडपट्टीत अमली पदार्थांचा फैलाव; शाळेतील मुलेही लक्ष्य

मुंबई : झोपडपट्टी परिसरात अमली पदार्थांचा विळखा वाढत आहे. यामुळे देशाचे भविष्य उद्ध्वस्त होत आहेच, शिवाय अनेक कुटुंबांच्या आशा, आकांक्षा यांनाही धक्का बसत आहे. यामागे फार मोठे रॅकेट आहे. आता शाळेतील मुलेही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थांमध्येही याचा प्रसार होत आहे. झोपडपट्टी परिसरातील अमली पदार्थांचा फैलाव थांबवावा,’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
‘गुजरातमधील बंदरांमध्ये हजारो किलो अमली पदार्थ येत आहेत, पण त्याच्या मूळाशी तपास यंत्रणा पोहोचत नाहीत. या अमली पदार्थांचा या समस्येशी संबंध आहे का, याच्या चौकशीची गरज आहे,’ असे सावंत म्हणाले. ‘या समस्येकडे पाहताना भाजपचा दृष्टिकोन केवळ राजकीय आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभाग केवळ अमली पदार्थ घेणाऱ्यांच्या मागे दिसला, पण अमली पदार्थ विकणारे पकडले जात नाहीत,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नशामुक्ती केंद्र असावे, अशी मागणी लवकरच करू, असे ते म्हणाले.

वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन सचिन सावंत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी झोपडपट्टी परिसरातील अमली पदार्थांचा फैलाव थांबवावा, अशी मागणी केली.









