
पुणे : कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यावरही आजाराचे गंभीर परिणाम त्याला जाणवू लागतात, मानसिक स्थिती अस्वस्थतेची होते. याकरिता पोस्ट कोविड ट्रीटमेंट सेंटर राज्य सरकारने उभी करावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला, त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावरही त्याला छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडथळा येणे, थकवा जाणविणे, मानसिक अस्वस्थता, नैराश्य जाणविणे असे परिणाम होत राहातात. रुग्ण कोरोना बाधित नसला तरी या परिणामांने जर्जर असतो. काही रुग्णांना आजाराचे परिणाम दीर्घ काळ होतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे आणि रुग्णांचे अनुभवही आहेत. पोस्ट कोविड ट्रीटमेंट सेंटर गरज झाली आहे. पुण्यामध्ये सुमारे एक लाख कोरोनाबाधित रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असले तरी त्यातील हजारो जणांना आजाराचे परिणाम गंभीरतेने जाणवत आहेत, असे आमदार शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
जम्बो केअर सेंटर उभारणीस विलंब झाला, त्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागला. पोस्ट कोविड सेंटर उभारणीस मात्र राज्य सरकारकडून विलंब होऊ नये, अशी अपेक्षा आमदार शिरोळे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.



