महामार्गालगत राडारोड्याचे ढीग तर कचरा जाळला जात असल्याने वाढला अपघाताचा धोका ; पहा व्हिडिओ सह बातमी..
कोथरुड : कोथरुड चांदणी चौक ते पाषाण सुतारवाडी पर्यंत मुंबई बेंगलोर महामार्गाच्या कडेने मोठया प्रमाणात राडारोडा व कचरा टाकला जात आहे. महामार्गाच्या कडेला टाकला जाणारा कचरा जाळण्यात येत असल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पण प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. The risk of accidents increased as garbage was being burned along the national highway
हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करून हा राडारोडा व कचरा हटविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मनसेचे कोथरुड बावधन प्रभाग क्रमांक १० चे अध्यक्ष सुभाष आमले यांचेकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चिटणीस यांच्याकडे देण्यात आले आहे.

राष्ट्रिय महामार्गाच्या कडेने अशा प्रकारे राडारोडा व कचरा टाकण्यात येत असतानाही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप सुभाष आमले यांनी केला आहे.



महामार्गालगत राडारोडा व कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात पण पालिकेने तर याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे, त्यामुळे याठिकाणी या प्रकारामुळे अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्न निर्माण होत आहे. या राडारोड्यामुळे व कचरा जाळला जात असल्याने महामार्गावर एखादा मोठा अपघात घडल्यावरच महामार्ग प्राधिकरण व पालिका प्रशासन जागे होणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अपघाताचा धोका टाळण्यासाठी लवकरात लवकर महामार्गालगत चा राडारोडा व कचरा हटविण्यात यावा अन्यथा म.न.से च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल इशारा आमले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.






