राज्यातील सर्व शाळांची वेळ सकाळी ९ ते दु. १ व दु. १ ते सायं. ६ वाजेपर्यंत व्हावी.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची मागणी

पुणे : शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्याकरिता त्यांची सकाळी झोप होणे गरजेचे आहे. असे झाल्यास त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासाबरोबर बौद्धिक क्षमता देखील वाढेल. या महत्त्वपूर्ण बाबीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कृपया शाळकरी मुलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहावे.याकरिता राज्यातील सर्व शाळांची वेळ सकाळी ९ ते दु. १ व दु. १ ते सायं. ६ वाजेपर्यंत व्हावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दिपक केसरकर आणि राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ याअभियानाच्या शुभारंभ केला आहे. याप्रसंगी आपण शाळांच्या वेळा बदलण्याचा घेतलेल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे.



पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. देश आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक विद्वान, पंडित, शास्त्रज्ञ यांनी पुणे शहरात विद्यार्जनाचे धडे घेतले आहेत. परंतु आज शैक्षणिक संस्था आणि शाळांच्या वेळांमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मानसिक आणि
शारीरिक स्वास्थावर विपरीत परिणाम होत आहेत. राज्यातील अनेक शाळा दोन सत्रांत सुरू आहेत.
सध्यस्थितीत पहिल्यासत्रात लहान मुलांच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी ७ ते दु.१२ वाजेपर्यंत भरतात, दुसऱ्या सत्रात दु.१२ ते सायं. ५ वाजेपर्यंत तसेच इंग्रजी माध्यमची शाळा पहाटे ६ ते सायं.५ वाजेपर्यंत भरतात. यासाठी पालक मुलांना सकाळी लवकर उठवतात, काही मुले शाळेपासून लांब अंतरावर राहत असल्यामुळे त्यांना तर खूपच लवकर उठवले जाते.
अशाप्रकारे शाळेत जाण्याकरिता पहाटे मुलांना उठवल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही.त्यामुळे मुलांमध्ये शारीरिक तक्रारी निर्माण होतात. वय ४ ते १५ वर्षे हे मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचे वय असते. अशा वेळेस पालक म्हणून आपण या मुलांना शारीरिक आराम, स्वास्थ दिले नाही तर त्यांचे अतोनात नुकसान होईल.



पालकांनाजेवणाचा डबा आणि मुलांची तयारी करणे या कामांकरिता सकाळी ४ ते ५ वाजता झोपेतून लवकर उठावे लागते. स्वतःचे आवरून मुलांचे आवरावे लागते. पालकांना देखील शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्याकरिता त्यांची सकाळी झोप होणे गरजेचे आहे. असे झाल्यास त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासाबरोबर बौद्धिक क्षमता देखील वाढेल. या महत्त्वपूर्ण बाबीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कृपया शाळकरी मुलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले रहावे.याकरिता राज्यातील सर्व शाळांची वेळ सकाळी ९ ते दु. १ व दु. १ ते सायं. ६ वाजेपर्यंत व्हावी. अशी विनंती मानकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.






