आजचे मोदी हे बाळासाहेब ठाकरेंची कृपा, पुण्यातून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : आजचे मोदी हे बाळासाहेब ठाकरेंची कृपा असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यात ठाकरे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं. यावेळी राऊत बोलत होते.
दरम्यान या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली होती. पुण्यातील आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर ठाकरे गटाकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हजेरी लावली होती.

गुजरातमधील दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी मोदींना मुख्यमंत्री पदावरुन काढायचं म्हणत होते. राजधर्माची आठवण करुन द्यायला अटलजी विसरले नव्हते. पण जेव्हा अडवाणी बाळासाहेब ठाकरेंना विचारायला आले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया. तुम्ही नरेंद्र मोदींना काढू नका. जेव्हा अख्ख जग टीका करत होतं, तेव्हा बाळासाहेबांनी हे सांगितलं होतं. पण आता देश म्हणतोय की, नरेंद्र मोदी वापस आया तो पुरा देश गया. त्यामुळे मोदी जर पुन्हा आले तर लोकशाही, स्वातंत्र्य सर्व काही जाईल, असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.



ही शिवसेना हा उसळता सागर आहे. पुण्याच्या मैदानात शिवसेना कशी उतरते बघा, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना देखील थेट इशारा दिलाय. आम्हाला शिल्लक सेना म्हणता. 2024 नंतर तुम्हीच शिल्लक राहणार का हा विचार करा. या महाराष्ट्रात ज्याला शिल्लक सेना म्हणता तीच सेना आम्ही पुन्हा सत्तेवर आणून दाखवू, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.









