मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे भावूक, भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले; म्हणाले आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही…

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे भावूक झाले आणि भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले. मनोज जरांगे भावूक झाल्याचे पाहून उपस्थित आंदोलकांचा देखील कंठ दाटून आले. तर, आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे काही वेळात मुंबईकडे निघणार आहेत. यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलतांना जरांगे भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यार्त अश्रू आले. स्वतःला सावरत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून एक महिना झाला तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. एवढा निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजेच अन्यायाचा कळस झाला. त्यामुळे शेवटी आता मराठ्यांनाच शांततेच अस्त्र हातात घेऊन, यांचं कायमचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असेल, आपले मुलं मोठे झाले नको पाहिजे असे यांनी ठरवले असेल, त्यामुळे यांचं राजकीय आयुष्य कायमचं सुपडासाप केल्याशिवाय चालणार नाही, असे जरांगे म्हणाले. यावेळी बोलताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले.
















