बीबीसी कार्यालयावर छापे; हे कोणत्या लोकशाहीत बसतं? उद्धव ठाकरेंचं विधान

नवी दिल्ली : बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाल्यावर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून टीका करताना हे कोणत्या लोकशाहीत बसतं असा प्रश्न उपस्थित केला आहे. आम्ही वाटेल ते करू पण आवाज नाही उठायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही जी पाशवीवृत्ती आपल्या देशात आज फोफावायला बघते आहे, ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपूर्ण देश खावून टाकेल.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो, त्यामध्ये न्यायव्यवस्था, प्रशासन, शासन यांच्यासह महत्त्वाचा स्तंभ म्हणजे माध्यम असतो. मी तुमच्याशी बोलत असताना या बातमीसोबतच बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाची लोक गेली आहेत, ही सुद्धा बातमी सुरू असेल. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? म्हणजेच काय, आम्ही वाटेल ते करू पण आवाज नाही उठायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही जी पाशवीवृत्ती आपल्या देशात आज फोफावायला बघते आहे, ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपूर्ण देश खावून टाकेल.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
याशिवाय, “दोन-तीन दिवसांपूर्वी मी उत्तर भारतीयांच्या एका बैठकीत गेलो होते, तेव्हा पण त्यांना मी हेच सांगितलं की त्यावेळची लढाई होती ती स्वातंत्र्याची लढाई होती, आता हे स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे. गुलामगिरी ती गुलामगिरीच असते मग ती स्वकीयांची असेल परकीयांची असेल. आता वंदे भारत, वंदे एक्स्प्रेस हे सगळं ठीक आहे, घोषणाही दिल्या जात आहेत. पंतप्रधान उद्घटानं करत आहेत, झेंडे दाखवले जात आहेत. पण त्याचवेळी ते दाखवलं जाऊन माझी भारत माता पुन्हा माझी गुलाम कशी होईल, या दिशेने त्यांची जी पावलं चालली आहेत ती पावलं वेळेत ओळखून आपल्याला एकत्र यायला पाहिजे.” असंही उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेना भवन येथे रियाज शेख यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत(ठाकरे गट) प्रवेश केला. त्यांचे उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून स्वागत केले. याप्रसंगी सुभाष देसाई यांचीही उपस्थिती होती.



