पुणे शहर

ज्ञान, भाव आणि शब्द दर्शनातून उभे राहिलेले जीवनवादी विवेक दर्शन म्हणजे संत साहित्य : डाॅ. रामचंद्र देखणे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन

पुणे : संत परंपरा, लोक परंपरा आणि सुधारकांची परंपरा हे महाराष्ट्राच्या लोकजीवनाला वळण देणारे तीन प्रवाह महाराष्ट्राला लाभले. त्यातील लोक परंपरेने महाराष्ट्राला भाव साक्षर केले. सुधारकांनी महाराष्ट्रला बुद्धि साक्षर केले तर ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा लोकव्यहराशी समन्वय साधत संतांनी महाराष्ट्रला विवेक साक्षर केले. ज्ञानदर्शन, भावदर्शन आमि शब्द दर्शन यातून उभे राहिलेले जीवनवादी विवेक दर्शन म्हणजे संत साहित्य होय असे मत संत साहित्याचे अभ्यासक डाॅ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिनांक 12 ते 16 डिसेंबर दरम्यान वारजे जकात नाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजीत भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची संत परंपरा व प्रबोधन’ या विषयावर ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांचे व्य़ाख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या तिस-या पुषुष्पाचे अध्यक्ष भानूदास जोशी, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि साहित्यीक वि.दा.पिंगळे उपस्थित होते.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm

डाॅ.रामचंद्र देखणे म्हणाले, संतांची अभंगवाणी हा मराठी शारदेचा अभंग ठेवा आहे. त्यात ज्ञानेश्वरांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळतोय तसेच तुकोबारायांच्या सूक्ष्म जीवन दृष्टीच्या वास्तववादी खुणाही डोकावताय आणि एकनाथांच्या लोक भूमिकाही लोकमनाशी संवाद करत आहेत. आध्यात्मिक विचार आणि भक्तीतत्त्वाबरोबरच मानवी जीवनमुल्यांच्या संदर्भातील उद्भोदन पाहता संतवाणीतून संतांचा वैश्विक मानवतावाद प्रकटत असून हा महाराष्ट्राचा पाचवा लोकवेद आहे. मराठी भाषेच्या नगरीत ब्रम्हविद्येचा सुकाळ करुन संतांनी भागवत धर्मातील भोळ्या भक्तीला आध्यात्मिक मानवतावादी बैठक मिळवून दिली. यामुळे पंढरपूरच्या वाळवंटात एकात्मतेची दिंडी निघाली आणि समतेची पताका फडकली. अद्वैताच्या महाराष्ट्रात भक्तांची देवाण-घेवाण झाली आणि याच वाळवंटात संत विचारांची एकचि टाळी झाली. संतांच्या या संकीर्तनातून ख-या अर्थाने उपेक्षितांचे मुकेपण संपले. उपेक्षितांच्या भाव-भावनांचे मुक्तपीठ म्हणजे संत साहित्य होय.

Img 20211129 wa0128

डाॅ.रामचंद्र देखणे म्हणाले, संतांनी संस्कृताची तीरे तोडून सारस्वताला मराठीचा घाट बांधला. मराठीतील सर्व बोलीभाषांना आपल्या साहित्यात स्थान देऊन त्यांना प्रमाण भाषेच्या जवळ नेले. म्हणुन आज ही मराठी बोली भाषेचे आस्तित्व टिकून राहिले आहे.देशभाषेची प्रतिष्ठा उभी करणयात संत साहित्याचे योगदान मोठे आहे. वाघ्या मुरळी, गोंधळी, वासुदेव, पिंगळा यासारखे उपेक्षित लोक भूमिकांना भारुडातून उभे करुन लोककलानांही उंची प्राप्त करुन देत माैखिक परंपरेतील एक मोठी लोकसंस्कृती उभी राहिली. भक्ती प्रबोधन, मूल्य जागरण आणि विवेकाची दृष्टी यातूनच संतांनी विवेक प्रामाण्यवाद दिला. त्याच विवेक प्रामाण्यवाद वर पुढे सुधारकांचा बुद्धिप्रामाण्यवाद उभा राहिला आणि महाराष्ट्राला पुरोगामित्व लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये