लतादिदींना ढोलकीची साथ देणारे अशोक कदम यांचे निधन

मुंबई : सुप्रसिद्ध तबला, ढोलकी वादक अशोक कदम (Ashok kadam Death) (वय 60) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) निधन झाले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा सहवास लाभणे, त्यांच्या गीतावर वादन करण्याची संधी मिळावी असे स्वप्न प्रत्येक कलाकाराचे असते. कल्याणमधील तबला, ढोलकी वादक अशोक कदम यांचे हे स्वप्न केवळ स्वप्न न रहाता तब्बल 25 वर्षे ते हे स्वप्न जगले. तसेच कल्याणमध्ये प्रथमेश म्युजिक अकादमी (Music Academy) सुरु करुन अनेक हुरहुन्नरी कलाकारांना घडविण्याचे काम अशोक करीत होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आदित्य – ओंकार ही दोन मुले आहेत.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात अशोक कदम रहाण्यास होते. मुळचे शहापूर येथील असणारे अशोक यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९६२ रोजी झाला. पिढीजात संगीताचा वारसा अशोक यांच्याकडे आला होता. अशोक यांचे वडील बालक्रिष्ण हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किर्तनकार होते. त्यांना पखवाज, शहनाई, तबला वादन येत होते. तसेच अशोक यांचे आजोबा रामचंद्र हे शास्त्रीय गीतकार होते, त्यांना शहनाई वादन येत होते. हा कलेचा वारसा अशोक यांच्याकडे आला असून अशोक हे उत्तम तबला व ढोलकी वादन करीत होते.
अशोक कदम यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले होते. तबला, पखवाज, ढोलकी वादनातील कौशल्यामुळे भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यासोबत काम करण्याची संधी अशोक यांना मिळाली. 1993 साली त्यांची दिदींसोबत पहिली भेट झाली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमातील अशोक यांचे वादन ऐकल्यानंतर 1998 मध्ये अमेरिका येथील एका कार्यक्रमात लता दिदींच्या गाण्याला साथ देण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर अनेक कार्यक्रमात अशोक यांनी देश परदेशातील अनेक कार्यक्रमात दिदींना गाण्यात साथ संगत केली. लता दिदींनी आर्शिवादपर दिलेले पत्र, 5 हजाराचे रोख बक्षिस अशोक यांनी जपले होते. दिदींचे आर्शिवाद लाखमोलाचे असल्याची भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरपर्यंत जपला. कल्याणातही चांगल्या दर्जाचे संगीत साधना केंद्र असावे म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रथमेश म्युझिक अकादमीची स्थापना केली होती. ज्यातून त्यांची मुलं आदित्य आणि ओंकार ही देखील त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. एवढ्या उच्च पदावर पोहोचूनही पाय मात्र नेहमीच जमिनीवर ठेऊन वावरणाऱ्या अशोक कदम यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनावर संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच कल्याणकर नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.




