पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरण : विनायक राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप

सिंधुदुर्ग : भाजप नेत्यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवणचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका; प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. तसेच, रिफायनरीच्या पैशांवर पोसलेला गुंड आंबेरकर हा केंद्रीय मंत्री नारायण राणे व निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे शशिकांत वारीसेंसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र पंढरीनाथ आंबेरकरने आखलं,” असा गंभीर आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, “रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीसे यांचा घातपात झाला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिसेंचा उल्लेख होता. वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा.”
“पंढरीनाथ आंबेरकर हा सराईत गुंड आहे. त्याने यापूर्वी असे अनेक प्रयत्न केले आहेत. २०२० साली कुंभवडेला मनोज महेकर या तरुणाच्या अंगावरही गाडी घालत ठार करण्याचा प्रयत्न केला होता. कारण, त्याचे वडील रिफायनरी विरोधी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत.”
“आंबेरकर हा रिफायनरीच्या पैशांवर पोसणारा गुंड आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्यांचा कायमस्वरून बंदोबस्त करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. वारिसेंची हत्या घडवून आणली असून, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे.”




