ओबीसींची जातनिहाय जनगणना भाजप टाळतंय : अजित पवारांचा आरोप

नागपूर : ज्यांनी ओबीसींसाठीच्या मंडल आयोगाला विरोध केला, त्या ढोंगी लोकांचा पडदा पाडण्याचे काम हे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. ओबीसींची जातनिहाय जणगणना झालीच पाहिजे. कुठल्याच समाजघटकावर अन्याय झाला नाही पाहिजे, असं स्पष्ट मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंगेसच्या ओबीसी मेळाव्यात व्यक्त केले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने बंटीया आयोगाची निर्मिती केली होती. आज भलतेच लोक त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले, तसेच आम्हालाही बेरजेचे राजकारण करायचे आहे. नवे चेहरे कसे देता येतील? याचा विचार केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी सुद्धा 24 तास लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
जातनिहाय जनगणना कराच
जातनिहाय जनगणना करा, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. नक्की कुणाची लोकसंख्या किती? हे चित्र स्पष्ट होईल. भाजप जातनिहाय जनगणना टाळत आहे. यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी आपण सगळ्यांनी लावून धरली पाहिजे. भाजप ओबीसी नेत्यांच्या मागे लागते. त्यांच्यासमोर अडथळे निर्माण करण्याचे काम करते. महापुरुषांना कमी लेखण्यासाठी व त्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी एक यंत्रणा काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बेरोजगारीची समस्या
देशात बेरोजगारीची मोठी समस्या असताना जातीय दंगली घडवण्याचा, तणाव व धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर गृह विभाग काय करतोय? असा सवालही त्यांनी विचारला. मोठे रोजगार देणारे उद्योग राज्याबाहेर जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
गद्दारांना जनताच धडा शिकवेल
कर्नाटकात काँग्रेसमधून जे बाहेर पडले होते ते सर्व हरले. महाराष्ट्रातही तसेच घडेल. जनता गद्दारांना धडा शिकवेल. मुख्यमंत्री सध्या 40 जणांना सांभाळण्यात व्यस्त असून जनतेच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याचा आरोप अजित पवारांनी केला.






