कर्वेनगर ग्रामस्थांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सोडवणार ; दीपक मानकर यांची ग्वाही

दीपक मानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्वेनगर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार
पुणे : कर्वेनगर ग्रामस्थांचा गेली चाळीस पन्नास वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व ग्रामस्थांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात येईल व शासन दरबारी प्रयत्न केला जाईल व हा प्रश्न सोडवलाच जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.
फटाक्यांची आतेषबाजी, फुलांची उधळण करत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचे कर्वेनगर मध्ये जल्लोषात ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक मानकर यांच्या कर्वेनगर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्काराचे. या सत्कार समारंभात बोलताना दीपक मानकर यांनी कर्वेनगरशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बाळासाहेब बराटे, माणिक दुधाने, कांता बराटे, पोपट फेंगसे, कुमार बराटे, बंडू तांबे संतोष बराटे, सचिन बराटे, बंडा बराटे, केदार बराटे, हर्षवर्धन मानकर, बाबू शेख, लक्ष्मी बराटे, तेजल दुधाने, संगीता बराटे, रेश्मा बराटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मानकर म्हणाले, कर्वेनगरशी माझे ऋणानुबंध अनेक वर्षांचे आहेत, त्यामुळे कर्वेनगर वासियांचे माझे नाते वेगळेच आहे. माझ्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने कर्वेनगर मधून सुरुवात झाली. या सत्काराच्या निमित्ताने मन भरून आल आहे. आपली माणसं जेव्हा घरातल्या माणसाचं कौतुक करतात तेव्हा अंतर्मनामध्ये असं वाटतं की, आपण जन्माला आल्यानंतर सदभाग्य केल्यामुळे या सत्काराला योग्य ठरलो असं वाटायला लागतं.
कर्वेनगर शहरात येऊन पन्नास वर्षे झाली तरी आपली प्रॉपर्टी कार्ड होत नसतील तर याच आश्चर्य वाटतय. आता पुणे शहरात पहिला प्रश्न कोणता सोडवायचा असेल तर तो कर्वेनगर च्या प्रॉपर्टी कार्डचा विषय मार्गी लावायचा आहे. या ठिकाणी असणाऱ्या मराठवाडा कॉलेज असेल कर्वे संस्था कमिन्स कॉलेज असेल त्या ठिकाणी जर कोणी कर्वेनगर मधील ग्रामस्थांना चुकीची वागणूक दिली तर त्यांना त्या पद्धतीचे उत्तर त्या ठिकाणी दिल्याशिवाय दीपक मानकर राहणार नाही. आमच्या गावात येता संस्था निर्माण करता आणि गाववाल्यांना तुम्ही विचारणारच नसाल तर ते चालणार नाही. असा इशारा मानकर यांनी या भागातील शिक्षण संस्थाना दिला. गायरानाची जागा मराठवाडा सारखी संस्था कशी ताब्यात घेऊ शकते या संदर्भातही आपण बोललो पाहिजे असं ते म्हणाले, कमिन्स कॉलेज मध्ये आमच्या येथील पाच तरी विद्यार्थ्यांना जागा दिल्या पाहिजेत असं पत्र ग्रामस्थांच्या वतीने त्यांना देण्यात येईल. आपल्या होतकरू घरातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना त्यामुळे संधी मिळेल.
या भागात चांगलं काम उभ राहील पाहिजे, या भागातील रोजगाराचा प्रश्न, महिलांच्या बचत गटाचा प्रश्न, गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. कर्वेनगर मधील कोणाचाही कोणत्या विषयासाठी मला फोन आला तर त्यांना कधी नाही म्हणून म्हटलं नाही आणि म्हणणार ही नाही. पक्ष कोणताही असू द्या माणुसकीचं नातं या सगळ्यांनी आपल्या आयुष्यात जोडलेलं आहे. त्यामुळेच कर्वेनगर परिसरात समाजात कोणत्याही प्रकारचा तेढ नाही. मला दिपकचा दीपक भाऊ कधी झाला हेच कळलं नाही , पण जीवनामध्ये या भावाने तुमच्यावर जे प्रेम केलं आहे ते कायम राहील असा मी शब्द या निमित्ताने देतो. एवढ्या प्रेमाची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा उर दाटून येतो. या मणसांशी असलेल रक्तापेक्षा वेगळं नातं मी जपलेल आहे. आणि हे आता अखंडितपणे ठेवण्याचा आशीर्वाद स्वामी समर्थांनी मला द्यावा.

मानकर म्हणाले , सामाजिक बांधिलकी जपत असताना अनेकांचा वाईट पणा घ्यावा लागतो. चांगले काम करत असताना राजकीय जीवनात टाकेचे घाव सोसावे लागतात आणि हे घाव सोसत असताना मी अध्यक्ष झालो. समाजामध्ये चागलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कोणताही प्रश्न न विचारता अजित दादांनी अध्यक्ष पद देऊन शहराची जबाबदारी दिली. पवारसाहेब आमचे राजकीय दैवत आहेतच, पण या दैवताला आमचं एकच मागणं आहे की, राज्याचं मुख्यमंत्री अजित दादांना करा. दादांसारखा नेता या महाराष्ट्राला मिळालेला आहे, जो गोरगरिबांचे प्रश्न जणू शकतो. दिवस रात्र सेवा करू शकतो अशा माणसाच्या पाठीशी माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणे आहे. तुमचे प्रश्न दादाचं मार्गी लावणार कारण माझा माझ्या नेत्यावर विश्वास आहे. चांगल काम कर्वेनगर परिसरात उभा करण्याचा संकल्प आपण करूया. कर्वेनगर वासियांनी जे प्रेम दिलेल आहे त्या प्रेमाची शिदोरी उराशी बाळगून वाटचाल करत असताना ज्या ज्या वेळी मोठा होईल त्या त्यावेळी कर्वेनगर वासियांची ची आठवण राहील.
प्रास्ताविक करताना बाळासाहेब बराटे म्हणाले, दीपकभाऊ मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. त्यांचे कर्वेनगरशी जुना ऋणानुबंध आहे. शिक्षण मंडळावर असताना येथील शाळेचा विकास त्यांच्या माध्यमातून झाला. शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पवान झालेली कर्वेनगरची भूमी आहे. दीपक मानकर हे सुभेदार खंडोजी मानकर यांचे वंशज आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे ही एक महत्वाची बाब आहे. पुण्याच्या राजकीय सामाजिक घडामोडीत दिपकभाऊ मानकर यांचा मोठा वाटा आहे. युवकांचे आदर्श, सामाजिक, राजकीय, कला सांस्कृतिक क्षेत्रात असलेला वावर, अशा दानशूर व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करताना आम्हा कर्वेनगर ग्रामस्थांना आनंद होत आहे. त्यांनी विधानसभेत जावं आणि पुण्याचं नेतृत्व करावं असं आमचं स्वप्न आहे. कर्वेनगर मधील अनेक विषय आहेत. ते सोडवण्यासाठी ते मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.



यावेळी पोपट फेंगसे, कांता बराटे, कुमार बराटे, तेजल दुधाने , रेश्मा बराटे, संगीता बराटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. ग्रामस्थांनी सांगितलेले प्रश्न सोडवण्याची ग्वाही मानकर यांनी यावेळी दिली. बंडू तांबे यांनी सूत्रसंचालन केले तर पोपट बराटे यांनी आभार मानले.



