जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 16 वा दिवस, मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा; आज मोठा निर्णय घेणार?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 15 दिवसापासून उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 16 वा दिवस आहे.जरांगे पाटील हे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे. जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर पंधरा मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री प्रत्यक्ष अंतरवाली सराटी गावात आल्यास उपोषण सोडणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
दरम्यान, उपोषणाच्या पंधराव्या दिवशी मंत्री उदय सामंत, मंत्री संदिपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह देखील करण्यात आला. यानंतर मनोज जरांगे यांची मुख्यमंत्र्यांबरोबर फोनवर चर्चा झाली आहे. त्यामुळं आज मुख्यमंत्री अंतरवाली सराटी गावात आल्यास जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. त्यामुळं आज उपोषणाच्या सोळाव्या दिवशी नेमका काय निर्णय होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी एक पाऊल मागे येत पाच अटी शिथिल करत मुख्यमंत्री आल्यावर उपोषण सोडणार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मराठा समाजाला 31 व्या दिवशी सरकारनं प्रमाणपत्र द्यावे.
मराठा आंदोलकांवर राज्यभरात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
लाठीचार्ज केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
उपोषण सोडताना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले पाहिजेत.
राज्य सरकार आणि मराठा समाज यांच्यामध्ये उदयनराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती हे दोन राजे हवेत. यांच्या वतीने बाँडवर लिहून द्या, त्यानंतर मी उपोषण सोडतो, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासंबधी अॅड. शिंदे यांची समिती नेमली असून त्यामध्ये जरांगे यांच्या प्रतिनिधीने यावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं.












