मस्तवाल योगी सरकार बरखास्त करा – आबा बागुल

पुणे : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष ,खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी दिलेली वागणूक अतिशय निंदनीय असून योगी आदित्यनाथ सरकारला सत्तेचा माज आल्याचे यातून दिसून येते, अशी संतप्त प्रतिक्रिया पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिचा अनन्वित छळ करण्यात आला. त्यात तिचा मृत्यू झाला. या तरुणीच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी खासदार राहुलजी गांधी निघाले असताना पोलीसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. राहुल गांधी शांततेच्या मार्गाने चाललेले असताना उत्तर प्रदेश पोलीसांनी दांडगाई केली. उत्तर प्रदेश सरकारच्या सुचनेवरुन पोलीसांनी ही दांडगाई केली. यातून उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा मस्तवालपणा, सत्तेचा माज दिसून येतो. हाथरस मधील घटनेनंतर बलरामपूर येथेही सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना उजेडात आली. हे थांबणार तरी कधी? ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशी मोहीम आखणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या घटनांनंतर गप्प कसे? त्यांनी कारवाई करून मस्तवाल योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करायला हवे असे आबा बागुल यांनी पत्रकात म्हटले आहे.



