पुण्यातील संचारबंदी नियमात पुणे पोलिसांकडून अंशत: बदल

पुणे : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुणेकरही तयारीला लागले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे, राज्य सरकारनं महापालिका क्षेत्रात लागू केल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केले आहेत.
पुणे शहरासह जिल्ह्यात आता रात्री संचारबंदी सह जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश काढल्याचं समजतं. आदेशानुसार, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान 5 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र फिरता येणार नाही. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं आहे.

पुणे पोलिसांच्या नव्या आदेशानुसार आता, पुणेकरांच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होते. मात्र, जमावबंदी लागू करण्यात आल्यानं पर्यटनस्थळांवरील उद्योग-व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर रात्री जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. शुक्रवार 25 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे ,पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.



