पुण्यातील प्रकल्प रखडले…हे तर भाजपचे अपयश – शिवसेना शहर प्रमुखांचा टोला

पुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी आज पुणे महापालिकेत येऊन विविध प्रकल्पाचा आढावा घेतला .पुण्यात केंद्रीय मंञी प्रकाश जावडेकर , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , खासदार गिरीष बापट, आणि सहा आमदार , पालिकेत एकहाती सत्ता आणि ९८ नगरसेवक असताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांना पालिकेत येऊन प्रकल्पाचा आढावा घ्यावा लागतो हे एक प्रकारे भाजपचे अपयश आहे . पुणे महापालिका निवडणुक एक वर्षावर येऊन ठेपल्यामुळे आता भाजपला विकास कामाबाबत जाग आली आहे.गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प पुर्ण झाला नाही. असा आरोप शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.(Projects in Pune stalled … This is the failure of BJP – Shiv Sena city chief’s tola)
मोरे म्हणाले, २४ तास पाणीपुरवठा योजना भाजपा नगरसेवकांमुळे अडली आहे, ठेकेदारांना काम करून द्यायचे नाही लाईन टाकण्याकरता खोदाई करताना अडवणूक करायची, ठेकेदारांना त्रास देऊन दमदाटी करणे यामुळे हे काम रखडले. नदी सुधार जायका प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठ्या थाटात केले. परंतु नदी सुधार कामाला अद्यापी सुरुवातही नाही. प्रकल्पान्वये भुयारातून गटारे वाहण्याऐवजी नदी पात्रातील पाण्यातून गटारे वाहत आहेत, तसेच नदीवरील पुलासाठी लाखो रुपये खर्च करून लाईट बसविण्यात आले परंतु या लाईटमध्ये नदीतील गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी पाहण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले आहे.

यासह अनेक प्रकल्प अपुर्ण राहिले आहेत. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत आहे सहा मीटर रस्त्याचे रंदीकरण करुन नऊ मीटर रस्ते करणे मोजक्या बिल्डरांचा फायदा होण्यासाठी घातलेला घाट आहे, या निर्णयामुळे लोकांची घरे बाधित होऊन लोकांना रस्त्यावर यायची वेळ भाजपा सत्ताधाऱ्यांमुळे आली आहे. PPE मॉडेल मधून होणारा खराडी मुंढवा रस्ता बिल्डरांचे हित जपण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. कोव्हिडच्या काळात केलेला बेसुमार मनमानी खर्च व त्यातून झालेला भ्रष्टाचार यावरुन भाजप मध्ये खदखद आहे. पालिकेतील भाजपा सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी सारख्या योजनांमध्ये होत असलेले भ्रष्टाचार याबाबत देखील नागरिकांमध्ये असंतोष आहे. स्मार्ट सिटीचे काम मागील 9 महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.
भाजपाला चार वर्षांमध्ये म्हणावा तसा विकास करता आलेला नाही. भाजपात अंतर्गत संघर्षाचे वातावरण असल्याने त्याचा फटका विकास कामांना बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या आढावा बैठकीनंतरहि विरोधी पक्ष नेत्यांना पालिकेमध्ये येऊन आढावा बैठक घ्यावी लागते. आणि आणखी विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष पुण्यात असूनही महापालिकेत फिरकले देखील नाहीत. तसेच भाजपाचे अनेक नगरसेवक आमच्या महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. यामुळे ही बैठक विकासकामांच्या संदर्भातली नसून भाजपा अंतर्गत वादाच्या समन्वयाची आहे. असे म्हणावे लागेल. असेही संजय मोरे म्हणाले.



